'मयुर', 'राजश्री', 'अरण्या', 'तेजोमय', 'नभोमणी', 'अन्यन्या' ही नावे आहेत, दिवाळीत दारी लागणाऱ्या कंदिलांची. यंदाची दिवाळी अधिक तेजोमय आणि कलात्मक करण्यासाठी ‘हर्षाभि क्रिएशन्स’ने पैठणी कंदिलांची निर्मिती केली आहे. वन्यजीव संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभिषेकने अंगी असलेल्या कलेची आवड जोपासून ‘हर्षाभि क्रिएशन्स’ सुरूवात केली. पत्नी हर्षदा साटम हिच्यासमेवत यंदा त्याने पैैठणीचे कंदील तयार केले आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकने कंदील बनविण्यास सुरूवात केली. सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजीही घ्यायला हवी. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यावर भर देत असल्याचे अभिषेकने सांगितले. गेल्या वर्षी त्याने कंदिलांना जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट केली होती. मात्र, यंदा काही नावीन्यपूर्ण करण्याच्या निमित्ताने या साटम दाम्पत्याने कंदिलांना पैठणीचे स्वरूप दिले. हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. शिवाय कंदिलांकरिता कागदी पिशव्याही तयार केल्या आहेत. मुंबई, विरार, बोरिवली, पुणे, लालबाग आदी भागांमधून या कंदिलांना मोठी मागणी आहे.