२५ वर्षांपूर्वी संघाचे वरिष्ठ नेते पूजनीय मोरोपंत पिंगळे यांनी ‘गाय ही सर्वार्थाने आपल्याला तारणार आहे,’ असा विचार मांडला. त्याआधारे सुरू झालेल्या कामाने. ‘गोविज्ञान’ विषयाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यात गोआधारित शेतीची महत्त्वाची भूमिका असू शकते, हे आता दिसू लागले आहे. त्याचबरोबर गोवैद्यक, पर्यावरणशुद्धता या प्रत्येक क्षेत्रात त्यामुळे भरीव बदल दिसू लागला आहे. ‘गोविज्ञान संशोधन केंद्र, पुणे’ ही संस्था यासाठी काम करते.
भारतीय संस्कृती ‘गोविज्ञान’ या विषयाकडे निराळ्या दृष्टीने बघते. गोमाता पूज्य आहे हा एक भाग. त्याच्या आधारे अवघ्या दहा किलो शेणात एक एकराची शेती होते. गाईचे महत्त्व पटवून जगातील गाईचे रक्षण करणे आपले काम आहे. या विषयाचे जागरण करण्यासाठी ‘वसुबारस’ हा दिवस आदर्श आहे. २५ वर्षांपूर्वी गाईचा उल्लेख समाजात तीन कारणांनी होत असे. एक म्हणजे गाय ही गोमाता आहे. दुसरे म्हणजे गाईचे दूध चांगले असते आणि तिसरे म्हणजे गोहत्येची समस्या आणि गोहत्येचे परिणाम. याखेरीज गाय ही मानवी जीवनाचे अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्र, माणसाचा मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे, हे स्पष्ट होईल. पूजनीय मोरोपंत यांनी ही भूमिका २५ वर्षांपूर्वी मांडून एका युगाचा प्रारंभ करून दिला याची प्रचिती हे आता स्पष्ट होत आहे. पू. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘गोविज्ञान अभियाना’त देशाचे आर्थिक, सामाजिक चित्र बदलण्याचे सामर्थ्य आहे. यावर्षीचा वसुबारस कार्यक्रम परिवारासाठी महत्त्वाचा आहे.
कारण, आज देशभर पसरलेला गोविज्ञानाच्या कार्यक्रमाचा यावर्षी रौप्यमहोत्सव आहे. या विषयाचा आरंभ झाला तो काही समारंभपूर्वक झाला नव्हता आणि फारसे काही ठरवूनही झाला नव्हता. पण त्याची सुरुवात डिसेंबर १९९४ मध्ये झाली. म्हणजे त्याचे असे झाले, गाय हा विषय राष्ट्रीय उत्थानाचा आहे, अशी भूमिका पूजनीय मोरोपंत यांनी संघाचे वरिष्ठ प्रचारक शामजी बल्लाळ आणि काही कार्यकर्ते मंडळींशी बोलून दाखविली. गोविज्ञान आणि गाय हे राष्ट्रीय उत्थान या विषयाचे अनेक संदर्भ श्रीगुरुजींच्या बौद्धिकातून मिळत असत. पू. मोरोपंत यांनीही ‘हा जबाबदारीचा विषय सांभाळणारी व्यक्ती आल्यावरच बोलू’ असे ठरवून त्याचे एक टिपण करून ठेवले होते. शामजी बल्लाळ आणि सुरेशजी हे या विषयासाठी मोरोपंतांना भेटले. ती त्या विषयाची खरी सुरुवात ठरली. त्यामुळे तेव्हापासून ‘गाय हे राष्ट्रीय उत्थानाचे प्रभावी माध्यम’ या कार्यक्रम पत्रिकेला आरंभ झाला.
‘आरंभ झाला’ असे म्हणायचे महत्त्वाचे कारण की, त्यातूनच आज मोठे काम उभे राहिले आहे. देशी गाईचे पाच-दहा किलो शेण आणि पाच-दहा किलो गोमूत्र यांच्या आधारे एक एकर शेतीच्या खताचे भक्कम मिश्रण तयार करता येते, हे शोधून काढणे आणि त्याचा प्रचार करणे ही देशाचे चित्र बदलणारी बाब आहे, हा मुद्दा त्यातून पुढे आला. त्या मिश्रणाला ‘अमृतपाणी़’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रात हे ‘अमृतपाणी‘ हे दहा किलो शेण, त्यात अर्धा किलो मध आणि पाव किलो तूप घालून तयार करण्यात येते. देशाच्या निरनिराळ्या भागात तेथील आवश्यकतेनुसार ती पद्धत निराळी आहे. यातील क्रांतिकारी मुद्दा असा की, त्यामुळे एका एकरला २० ते ४० हजार रुपयांचे रासायनिक खत घालून माणसाच्या शरीरात आजाराच्या शक्यता निर्माण करणार्या शेतीपद्धतीला शेतकर्याला सहज परवडू शकेल, असा पर्याय निघाला. पूजनीय मोरोपंत म्हणत की, ‘गाय ही आपल्याला तारणार आहे’ याची प्रचिती लगेच येत असे. पण त्याच्या आधारे शेतकर्यांना खतासाठी बँकातून कर्जे घेण्याची आवश्यकता संपते.
त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या होण्याच्या शक्यताच संपतात. दुसर्या बाजूला ५० वर्षे रासायनिक खते वापरून बिघडलेली शेतांची स्थिती सुधारते. तेवढेच महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला चांगले धान्य आणि चांगले अन्न मिळायला सुरुवात होते. आज घरोघरी अन्नखर्चाएवढाच औषधखर्च झाला आहे. त्याला या गाईच्या शेणाच्या अमृतपाण्याच्या खतावर आधारित निर्माण झालेली फळे, भाज्या, धान्य मिळू लागल्यावर फक्त औषधखर्च वाचतो असे नव्हे, तर माणसाच्या विकासाची गतीच बदलते. असे जे गोविज्ञानाचे परिणाम आहेत, ते गोवैद्यक, सार्वजनिक प्रदूषण कमी करणे याही क्षेत्रात तेवढेच क्रांतिकारक आहेत. पण सर्वात मोठा परिणामकारक भाग म्हणजे शेतीचा खर्च कमी होणे आणि गाय घरी असेल तो अगदीच नाममात्र असणे.
आज भारतात या पर्वाला सुुरुवात झाली आहे. प्रत्येक राज्यात कामं सुरू झाली आहेत. प्रत्येक राज्यातील कामाचा स्वभाव भिन्न आहे. प.बंगालमधील रोगराईवर आपल्या कार्यकर्त्यांनी गोमुत्राचे औषध दिले तर तेथील लोकांच्या व्याधी तर कमी झाल्याच पण दारू सुटली. महाराष्ट्रात या मोहिमेतीलपहिले दत्तक गाव नगर जिल्ह्यातील मांजरसुंभा हे आता कृषी पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. तेथे आता प्रत्येक घरी भाकड गाईचे स्वागत होत आहे. दुधाखेरीजची गाय ही अधिक परिणामकारक असते, हे मोरोपंतांचे विधान याची प्रचिती आता येऊ लागली आहे. गोआधारित शेती ही एवढी प्रभावी पद्धती असूनही ती सांगितल्या सांगितल्या स्वीकारली जाईल, अशी कोणत्याही सामाजिक कामाची स्थिती नसते. तुलनेने आज महाराष्ट्रात पाच लाख एकरात पूर्णत: किंवा अंशत: अशी शेती सुरू झाली आहे. दहा गावे दत्तक आहेत. २०० गावांमध्ये विस्तारकांच्या मदतीने काम सुरू आहे आणि राज्यातील प्रत्येक गावात पाच, दहा शेतकर्यांचे गट ही शेती करत आहेत. प्रत्येक राज्यातच या कामाला मोठा वाव आहे. पण महाराष्ट्रात तो अधिक आहे कारण, येथे उसासाठी रासायनिक खतांचा वापर फारच मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या ५० वर्षांत चांगल्या शेताची मोठी हानी झाली आहे. ती हानी भरून काढायचे सामर्थ्य या गोआधारित पद्धतीत आहे.
माणसावर सुसंस्कार झाल्यावर त्याचा फायदा किती आणि सुसंस्कार नसतील तर तोटा किती या दोन्ही बाजून न मोजता येण्याच्या पलीकडच्या असतात. शेतीचेही तसेच आहे. रासायनिक खतासाठी महाराष्ट्रात प्रत्येक गावात वर्षाला चार ते पाच कोटी रुपये खर्च होत असत, अशी माहिती आज हाताशी येत आहे. त्यासाठीच्या कर्जातूनच अनेक बँका उभ्या राहिल्या आणि बुडल्याही. पण घरात गाय असेल तर पाच ५० रुपयांत एक एकराचे प्रभावी खत होते, यामुळे शेतकर्यांचा आत्मविश्वासच बदलला आहे. २५ वर्षांपूर्वीची ‘ती’ तीन व्यक्तींची अनौपचारिक बैठक ही काही मुहूर्त ठरवून झाली नाही, पण त्या विषयाचा विशाल वटवृक्ष झाला आहे. त्याचा विस्तार देशभर झाला आहे. प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक प्रांतात आज प्रचारकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच कार्यरत आहे. शेकडो शिक्षण संस्था आणि शेकडो प्रयोगशाळा त्यांच्याकडील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसह यात सहभागी झाल्या आहेत.
जगात आज या विषयाचे जेवढे आव्हान आहे, त्यापेक्षा ते अधिक वाढणार आहे. गेल्या महिन्यात सार्यांनीच दक्षिण अमेरिकेतील ‘अॅमेझॉन’ जंगलातील मोठ्या वणव्यांच्या बातम्या वाचल्या असतील. त्या जंगलाची व्याप्ती ५५ लाख ते ६३ लाख चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र भारताचा क्षेत्राच्या जवळ जवळ दुप्पट आहे. हे सारे जंगल जाळून तेथे भारतीय वंशाच्या गाई वाढवून त्यांचे मांस जगात विकायचे फार मोठे षड्यंत्र सध्या ब्राझीलमध्ये तयार होते आहे. या विषयाची पार्श्वभूमी अशी की, जगात भारतीय गाईंची भारताबाहेर अधिकाधिक संख्या असणारा देश म्हणजे ब्राझील होय. तेथे सध्या एकूण गाईंची संख्या २१.५ कोटी आहे. त्यात भारतीय वंशाच्या म्हणजे मानेवर वशिंड असणार्या गाईंची (या गाईंना जगात ‘झेबु’ म्हणतात) संख्या ८० टक्के आहे.
जेथे जशी ब्राझीलमध्ये भारतीय गाईंची संख्या आहे तशीच मोठी संख्या तेथील अर्जेंटिना, पेरू, चिली, कोलंबिया, व्हेनेंझुएला अशा नऊ देशांचा समावेश आहे. तेथेही गाई पाळणे आणि गोमांस विकणे हा व्यवसाय आहे. त्या प्रत्येक देशात गाईंच्या भारतीय वंशाच्या गोवंशाचे प्रमाण एक महत्त्वाचा भाग असतो. त्याच भागात सहा देशात पसरलेल्या ‘अॅमेझॉन’ नदीच्या खोर्यात पसरलेले हे जवळजवळ २५ लाख चौरस मैल क्षेत्रात पसरलेले घनदाट हिरवे जंगल हळूहळू कमी करून तेथे गायराने उभी करण्याचा प्रयत्न गेली १५-२० वर्षे झाला आहे. प्रथम तो प्रयत्न थोडा थोडा असे आता तो प्रयत्न मोठ्या प्रमाणावर आहे. कारण, ती कार्यक्रमपत्रिकाच तेथील सत्ताधारी राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिली आहे. भारतीय गोवंशाची जगातील संख्या किती हा व्यापक चर्चेचा विषय आहे. माझ्या निरीक्षणाच्या आधारे ती १०० कोटी आहे. त्यातील पुढील भाग म्हणजे दरवर्षी ५० कोटी गाई या गोमांसासाठी वापरल्या जातात. जगातील आजची अशी स्थिती आहे की, भारतीय गोवंशाचे मांस सर्वात चविष्ट मानले जाते. त्यामुळे प्रत्येक देश यात किती गुंतला आहे, हे स्पष्ट करताना अमेरिका चीनला १५ हजार कोटी रुपये किंमतीचे गोमांस पाठवते एवढे एक उदाहरण पुरे आहे. या अनुषंगाने गोमातेच्या सर्वात्मक रक्षणासाठी आणि त्याद्वारे देशाच्या कल्याणासाठी‘गोविज्ञान अभियान’ काळाची गरज आहे, हे निश्चित.