नवी दिल्ली : रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांवर बंगालमध्ये वारंवार हल्ले केले जात आहेत. मुर्शिदाबाद येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्याची गर्भवती पत्नी ब्यूटी आणि आठ वर्षांचा मुलगा हे ८ ऑक्टोबर रोजी जियागंज येथील त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले होते. त्यांची हत्यादेखील धार्मिक कारणावरून झाला असल्याचा संशय बंगालमधील संघ कार्यकर्ते आणि भाजपकडून वर्तवला जात आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या होणे चिंतेची बाब असून राज्यात सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पक्षाचे नेते कैलास विजय वर्गीय यांच्या नेतृत्वात बीजेपीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. तसेच याप्रकरणाचा तपास योग्यरितीने होऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. या समितीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, पक्षाचे नेते एस.एस. अहलुवालिया आणि मुकुल रॉय यांचा समावेश होता. याप्रकरणी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.