वसईत ठाकूर साम्राज्याला माजी पोलीस अधिकार्‍याचे आव्हान

    12-Oct-2019
Total Views | 51



राज्यातील ज्या काही चुरशीच्या आणि चर्चेतीललढती ज्या मतदारसंघात होणार आहेत
, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे नालासोपारा. माजी ‘चकमक’फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी राजकारणात प्रवेश करून थेट नालासोपारा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यांची लढत ही दिग्गज हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांशी होणार आहे. त्यामुळे या लढतीबाबत चुरस निर्माण झालेली आहे.



वसई मतदारसंघाचे विभाजन होऊन नालासोपारा या स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली
. नालासोपारा आणि विरार शहरांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. ऑगस्ट २०१९ पर्यंत केलेल्या मतदारनोंदणीनुसार या मतदारसंघाची मतदार संख्या पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ५ लाख, १२ हजार, ३५७ एवढी आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २००९ आणि २०१४ अशा दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत वसईतील पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे येथील आमदार आहेत. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जात होता. विरारमधील स्थानिक वाडवळ, भंडारी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, किनारपट्टीवरील कोळी आदी स्थानिक मराठी भूमिपुत्र मुंबईतून येऊन स्थिरावलेला मराठी कोकणी मध्यमवर्गीय या मतदारसंघात आहे. मात्र, हा मतदारसंघ ओळखला जातो तो उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांसाठी. नालासोपारा पूर्वेला हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीयांच्या वसाहती आहे.



बविआचा सुरक्षित मतदारसंघ असला तरी उत्तरभारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे या मतदारसंघात भाजपने आपली पकड बसविण्यास सुरुवात केली होती
. मागील वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले होते. भाजपचे राजेंद्र गावित त्यात जिंकले आणि त्यांनी नालासोपारामधून त्यांनी चांगली आघाडी घेतली होती. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे गावित यांना नालासोपारामधून २५ हजार मतांची आघाडी मिळाली आणि बविआचा हा सुरिक्षत किल्ला भेदू शकतो, असा ठाम विश्वास सेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये आला. नालासोपारा पूर्वेला उत्तर भारतीयांची ८० हजार निर्णायक मते आहेत. त्यामुळेच लोकसभेच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, मनोज तिवारी आदी येथे प्रचारासाठी आले होते. उत्तर भारतीय, गुजराती ही भाजपची वोट बँक मानली जाते. या उत्तर भारतीय मतदारांमुळे भाजपने या मतदारसंघावर आपला दावा सांगितला होता. मात्र, आता ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे.



२००९ च्या विधानसभा निवडणुकीत बविआच्या क्षितिज ठाकूर यांनी शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांचा पराभव केला होता
. क्षितिज यांना ८९ हजार, २८४ मते, तर चव्हाण यांना ४८ हजार, ५०२ मते मिळाली होती. क्षितिज ठाकूर यांनी ४० हजार, ७८२ मतांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. सेना-भाजप यांची एकत्रित मते १ लाख, १३ हजार, ५६६ एवढी होती. भाजपच्या राजन नाईक यांना ५९ हजार, ६७, तर शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना ४० हजार ३२१ मते मिळाली होती. राजन नाईक यांनी ठाकूर यांना झुंज दिली. मात्र, त्यांचा ५४ हजार, ४९९ मतांनी पराभव झाला. मात्र, यंदा उद्धव ठाकरे यांनी नालासोपारा मतदारसंघ मागून घेतला आणि या ठिकाणी शिवसेनेतून माजी ‘चकमक’ फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांन उमेदवारी दिली. यामुळे ही निवडणूक मोठी चुरशीची व औत्सुक्याची मानली जात आहे. शर्मा यांनी कॉर्पोरेट कंपन्या नेमून प्रचार सुरू केला आहे. शहरात येण्यापूर्वीच त्यांनी ‘चोर-पोलीस’ असे वादग्रस्त फलक लावून खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा धडाक्यात प्रचार सुरू आहे. प्रदीप शर्मा यांना भेटण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, ती मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.




शहरातील समस्या

 

नालासोपारा शहराच्या पूर्वेला हजारोंच्या संख्येने चाळी, अनधिकृत इमारती आहेत. अरूंद रस्ते, त्यावर झालेली अतिक्रमणे, नियोजनशून्य उभ्या राहिलेल्या इमारती आणि दिवसेंदिवस होत असलेली लोकसंख्येची वाढ ही नालासोपारा मतदारसंघाची ओळख आहे. बकाल शहर म्हणून नालासोपारा शहराला ओळखले जाते. पाऊस पडला की नालासोपारा शहर जलमय होते. ही सर्वात मोठी समस्या आहे. अरूंद रस्ते, वाहतूककोंडी, अतिक्रमणे, रिक्षाचालकांची दादागिरी, फेरीवाल्यांचा विळखा आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.


-
विश्वनाथ कुडू

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121