'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-३' च्या भुयारी मार्गिकेच्या कामाने शहरात सध्या वेग धरला आहे. एकामागून एक या मार्गिकेतील भुयारे खणून पूर्ण होत आहेत. त्यामुळे डिसेंबर, २०२१ पर्यंत या मार्गिकेचा 'कुलाबा ते वांद्रे' हा पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची शक्यता दाट आहे. शनिवारी 'मट्रो-३' चा २० टप्पा धारावी येथे पूर्ण झाला. माहिमच्या नयानगर येथील विवरातून धारावीचे दिशेेने भुयारीकरणासाठी सोडलेले 'कृष्णा-२' हे 'टीबीएम' यंत्र शनिवारी जमिनीबाहेर पडले. या यंत्राने चार महिन्यांमध्ये माहिम ते धारावी या दरम्यान ५९० मीटरचे भुयार खणले. यावेळी यंत्राने पश्चिम रेल्वेवरील 'माहिम ते वांद्रे' दरम्यानच्या रुळांखालून सुरक्षितरित्या भुयारीकरण पूर्ण केले. शिवाय मिठी नदीला जोडणाऱ्या एका पात्राच्या समांतर जाणारे भुयार खणून धारावी येथे बाहेर पडले.
'मेट्रो-३' प्रकल्पाची लांबी ३३.५ किमी असली, तरी दोन भुयारे मिळून एकूण ५२ किमीचे खोदकाम सुरू आहे. धारावी येथे पूर्ण झालेल्या भुयारीकरणामुळे ५२ किमीच्या एकूण भुयारीकरणापैकी ३८.८ किमीचे भुयार खणून पूर्ण झाले आहे. तर ३२ पैकी २० भुयारे तयार झाली आहेत. या मार्गिकेच्या निर्माणाकरिता सध्या मुंबईत जमिनीपासून ३० ते २० मीटर खाली भूगर्भात १७ 'टीबीएम' यंत्रे कार्यरत आहेत. या कामाअंतर्गत जमिनीखाली दोन भुयारे खणण्यात येत आहेत. ही यंत्रे २० मीटर जमिनीखाली बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून मार्गक्रमण करतात.