बुलडाणा : केंद्रीय गृहमंत्री यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांसह अन्य पवार कुटूंबियांवर सडकून टीका केली आहे. राज्याची निवडणूक दोन आठवड्यांवर येऊन ठेपली असताना अमित शाह यांनी बुलडाण्यातील चिखलीतील सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी भाजपने विकास केला नाही, असे म्हणत टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आमच्याकडे इतके मुद्दे आहेत, ते भागवत सप्ताह संपला तरी संपणार नाही, असा टोला अमित शाह यांनी पवारांना लगावला.
चिखली शहराचे ग्रामदैवत रेणुका मातेला नमन करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी जिजाऊ आणि जिल्ह्यातील शहिदांचे त्यांनी स्मरण केले. कलम ३७० हटल्यानंतर देश एकसंध झाल्याचे ते म्हणाले. "जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा प्रभाव आहे. ३७० हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांनी कठोर निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, हे दाखवून दिले. ३७० संदर्भात गुलाम नबी आझाद म्हणाले होते. काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. मात्र, रक्ताचा एक थेंबही सांडला नाही."