मुंबई : पीएमसी बॅंक प्रकरणाची सर्व जबाबदारी आरबीआयकडे असून अर्थमंत्रालय या प्रकरणी कोणताही हस्तक्षेप करणार नाही, मात्र, या प्रकरणी गरज भासल्यास त्यासंदर्भातील निर्णय देण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केले. मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पीएमसी बॅंकेतील खातेधारकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांनी पत्रकार परिषदेपूर्वी भाजप कार्यालयाबाहेर निर्दशने केली होती. त्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आरबीआयच्या अखत्यारित हे प्रकरण असल्याने तूर्त कोणतिही थेट पावले अर्थमंत्रालय उचलणार नाही. मात्र, केंद्रीय अर्थमंत्रालय अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेईल, पुढील संसदीय अधिवेशनात यावर कायदा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, पीएमसी बॅंक प्रकरणात दोन अर्थसचिव आणि आरबीआय डेप्युटी गव्हर्नर यांची बैठक घेण्यात येणार असून या प्रकरणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे, असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.