प्रियांकाचे आगमन - संधी आणि आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवून एक मोठा धक्का सर्वांना दिला आहे. कारण, त्यांच्या या निर्णयात एक मोठी राजकीय जोखीमही आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे मतदारसंघ पूर्व उत्तर प्रदेशात आहेत. म्हणजे एकप्रकारे मोदी-योगी यांना आव्हान देण्याचे कामही त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
 

राजकारण हे सरकत्या रंगमंचासारखे असते. ज्यातील रंग व दृश्ये सतत बदलत असतात. उत्तरप्रदेशात सप-बसप यांनी युती करून एक राजकीय चित्र तयार केले होते. त्याला धक्का प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने दिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली बहीण प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणल्याने देशाच्या सर्वात मोठ्या राज्यातील सप-बसप या दोन्ही पक्षांना जबर तडाखा बसला आहे. विशेष म्हणजे, प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे वाराणसी, प्रयाग, कानपूर-गोरखपूर, फुलपूर या भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे मेरठ, आग्रा, बागपत, सहारनपूर, अलिगढ, कैराना या जाटप्रभाव भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे तीन भाग मानले जातात. त्यातील पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेचे ३३ मतदारसंघ आहेत. मध्य उत्तर प्रदेशात १४ मतदारसंघ, तर पश्चिम उत्तर प्रदेशात ३३ मतदारसंघ आहेत.

 

सप-बसपला उत्तर

 

उत्तर प्रदेश हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९७७ च्या जनता लाटेत तो उद्ध्वस्त झाला. मात्र, तीन वर्षातच १९८० मध्ये काँग्रेसने तो पुन्हा काबिज केला. १९९० च्या मंडल-कमंडलच्या राजकारणात काँग्रेसच्या हाती कमंडल आले आणि पक्ष राजकीय वनवासात गेला. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, गोविंद वल्लभ पंत, कमलापती त्रिपाठी यांच्यासारखे रथी-महारथी देणाऱ्या या राज्यात काँग्रेसचे पानिपत होत राहिले आणि भाजप, सप-बसप या तीन पक्षांनी राज्यातील राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त अमेठी व रायबरेली या दोन जागा पदरात पडलेल्या काँग्रेसने २०१९ साठी मात्र मोठी अपेक्षा ठेवली होती. सप-बसप आपल्यासाठी १२-१४ जागा सोडतील असे पक्षाला वाटत होते. पण सप-बसप-लोकदल यांच्यात युती होऊन, फक्त अमेठी-रायबेरलीच्या दोन जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसची फार मोठी कोंडीं झाली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेससाठी एवढा मोठा अपमान पचवणं जड होते. काँग्रेस १५-२० जागांवर आपले उमेदवार उभे करेलअशा एक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवून एक मोठा धक्का सर्वांना दिला आहे. कारण, त्यांच्या या निर्णयात एक मोठी राजकीय जोखीमही आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे मतदारसंघ पूर्व उत्तर प्रदेशात आहेत. म्हणजे एकप्रकारे मोदी-योगी यांना आव्हान देण्याचे कामही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यात कितपत यशस्वी होतील, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीचे निकाल देणार आहेत. प्रियांका गांधी यांच्यात राजकीय गुण आहेत, असे म्हटले जाते. त्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.

 

प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा झाली, त्याच दिवशी एक जनमत चाचणी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात उत्तर प्रदेशात भाजपला ८० पैकी १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप-बसप युतीत काँग्रेसही सामिल झाल्यास भाजपला ८० पैकी फक्त पाच जागा मिळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मात्र, प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने राज्याचे राजकारण बदलेल आणि दुरंगी लढतीऐवजी तिरंगी लढत होईल व याचा फायदा भाजपला मिळेल असा अंदाज भाजप वर्तुळात वर्तविला जात आहे. प्रियांकाचे आगमन भाजपसाठी संधी आहे व आव्हानही आहे, असे म्हटल्यास ते योग्य ठरेल. राज्यातील प्रभावशाली मुस्लीम समाज भाजपला मतदान करणार नाही. हा समाज एकगठ्ठा सप-बसप युतीला मतदान करील असे वाटत असताना, प्रियांकाचे आगमन झाले. याने मुस्लीम समाजाच्या भूमिकेतकाही बदल होईल की स्थानिक पातळीवर मतदान करण्याचा निर्णय घेतला जाईल, हे आज सांगणे अवघड आहे. दुसरा मुद्दा म्हणजे दलित समाजाचा. हा समाज मायावतींसोबत राहील असे मानले जाते, तर यादव समाज अखिलेश यादव यांच्यासोबत राहील हे गृहीत धरले जाते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो राज्यातील आणखी एक प्रभावी ब्राह्मण समाज कुणाकडे जाणार? पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी असताना ब्राह्मण समाज काँग्रेसला मतदान करीत असे. नंतर काँग्रेसची वाताहत लागल्याने ब्राह्मण समाज भाजप, मायावती, अखिलेश यादव यांच्यात विभागला गेला. बसपने एका निवडणुकीत ‘तिलक, तराजू और तलवार’ ही घोषणा दिली होती. आता हा समाज पुन्हा गांधी घराण्याकडे जाईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ज्याचे उत्तर आजतरी देता येणार नाही. ब्राह्मण व सवर्ण समाजाने काँग्रेसला साथ दिल्यास ते भाजपसाठी योग्य ठरणार नाही. मायावतींच्या विरोधात ब्राह्मण समाजाने काँग्रेसला साथ दिल्यास त्याचेही परिणाम वेगळे असतील. छत्तीसगढमध्ये मायावती व अजित जोगी यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. याची प्रतिक्रिया सवर्ण समाजात उमटली व त्यांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले. हेच उत्तर प्रदेशात होईल का, हाही एक प्रश्न विचारला जात आहे. प्रियांका गांधी सध्या विदेशात आहे. त्या भारतात परतल्यावर उत्तर प्रेदशमध्ये जातील. तेव्हा स्थानिक जनता विशेषत: महिला, युवा त्यांना कितपत व कसा प्रतिसाद देतील हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. सप-बसप यांच्या जातीय राजकारणाला कंटाळलेली जनता काँग्रेसकडे वळणार का, हा एक प्रश्न विचारला जात आहे. तसे झाल्यास प्रियांकाचे राजकारण भाजपला नाही, तर सप-बसप यांना धक्का देणारे ठरू शकते. अर्थात, हे केवळ प्रश्न आहेत, शक्यता आहेत.

 

जनमत चाचण्या

 

मागील आठवड्यात काही जनमत चाचण्या प्रसिद्ध झाल्या. त्यात भाजपच्या जागा कमी होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. भाजपला मोठा धक्का उत्तर प्रदेशात बसेल असेही सांगण्यात आले आहे. बहुतेक जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जवळपास समान आहेत. त्यात भाजप २०० च्या आसपास जागांवर विजयी ठरेल, असे सांगण्यात आले आहे. या जनमत चाचण्यांना आधार मानता येणार नाही. त्या नेमक्या ठरू शकतात, चुकीच्या ठरू शकतात वा चाचण्यांमध्ये जी स्थिती सांगण्यात आली आहे त्यापेक्षा कमी जागा त्या त्या पक्षांना मिळू शकतात. सध्याचे चित्र भाजपसाठी काहीसे अडचणीचे दिसत असले तरी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हे चित्र केव्हाही बदलले जाऊ शकते, असे भाजप नेत्यांना वाटते. भाजप नेते अद्यापही ३५० चा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवित आहेत. यात उत्तरप्रदेशात ७५, तर महाराष्ट्रात ४० जागांचा अंदाज सांगितला जात आहे.

 

सीबीआय प्रमुखांची निवड

 

सीबीआयचा नवा संचालक निवडण्यासाठी २४ जानेवारीला झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत ८० नावांवर चर्चा झाल्याचे समजते. हे एक रेकॉर्ड मानले जाईल. आता या बैठकीची नव्याने तारीख घोषित केली जाईल. त्यातही पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते व सरन्यायाधीश यांना मान्य होईल असे नाव निश्चित होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे समजते. दरम्यान, हंगामी संचालक नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहेत. यात सीबीआयच्या कामाचे काय होत असेल, हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@