बापरे! ‘इझमवाली’ पगडी?
“इझमचा शिक्का असलेली संमेलनाध्यक्षाची पगडी घालणार नाही,” असे मत १९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. प्रत्येकाचे स्वतःचे असे अभिव्यक्त होणे गरजेचे असते. आता प्रश्न असा आहे की, प्रेमानंद गज्वी यांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना पगडीबिगडीचा आक्षेप होता की नव्हता माहिती नाही. पण, कार्यक्रमाप्रसंगी असे काहीसे अभिव्यक्त झाले की, तथाकथित पुरोगामीपणाची झूल वाढते, हे अनुभवांती त्यांना माहिती असावे, हे नक्की. पगडी ही कोणता ‘इझम’ बाळगते? मागे शरदकाका आणि भुजबळ काकांनाही पगडीचे कोडे होते. पगडीखाली असे काय दडले आहे? खरे तर काही स्वघोषित पुरोगामी लोक स्वतःच्या मनात जातीय विष घेऊनच जगत आहेत. त्यांच्या प्रत्येक वागण्यात, बोलण्यात हे विष सहज येते. मात्र, आपल्या विषाला ते न्यायाचा आवाज, माणुसकीचा संदेश, यल्गार आणि सत्याची निष्पक्ष भूमिका वगैरे सांगतात. प्रेमानंद गज्वी जेव्हा म्हणतात की, “नकार, विद्रोह आणि अंत्योदयाचा विचार असलेल्या नाटकांना लोकाश्रय लाभत नाही” तेव्हा वाटते की, गज्वीही कोणत्या तरी ‘इझम’चा पुरस्कार करत आहेत. “बाबरी ते दादरीला लोकाश्रय मिळाला नाही,” असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा वाटते की, सच्च्या भावना आणि विचारांना जागून कुणाचाही तिरस्कार न करता सहजपणे अभिव्यक्त होणाऱ्या कलाविष्काराला समाज स्वीकारतोच. पण, ‘मी म्हणतो तेवढेच काय नीतिमत्तापूर्ण, खरे बाकी सगळे फालतू, अविवेकी असे मानणे म्हणजे सर्जनशील कलाकृती असणे,’ हा जो काही तर्कहीन विचार आहे ना, तो आता बाद होत आहे. जर कलाविष्कारामधून व्यक्त होणारा नकार विद्रोह हा समाजाच्या अंत्योदयासाठी असेल तर ठीक आहे. मात्र, समाजात मुद्दाम अविश्वास, फूट पाडणाऱ्या आणि देशातली सगळी सकारात्मकता डावलून प्रत्येक गोष्टीत जातीयतेची विषवल्ली शोधू पाहणाऱ्या आणि वर स्वतःला नकार देणारे, विद्रोही वगैरे समजणाऱ्यांना समाजाने का सहन करावे? आताही अखिल भारतीय नाट्यसंमेलनात खूप काही चांगले होईल, मात्र त्या सर्व सकारात्मक बाबींपेक्षा गज्वींना चिंता आहे ती पगडीची. या पगडीखाली काय दडलंय देव जाणे?
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/