नवी दिल्ली : कर्नाटक सरकारच्या दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी दिलेल्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसला धक्का बसला आहे. एच.नागेश आणि आर.शंकर या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठींबा जाहीर केल्यामुळे आता भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करेल, अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
दोन्ही अपक्ष आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहून त्यांचा पाठींबा काढून घेतल्याचे जाहीर केले आहे. सत्ता स्थापनेला अवघे सात महिनेच झाले असताना आता कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला सुरुंग लागल्याने नेते चिंतेत आहेत.
कुमारस्वामी मात्र, निश्चिंत असून मला माझ्या ताकदीचा अंदाज आहे, असे म्हणत आहेत. दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे काही होणार नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांना दिली. केसी वेणुगोपाल बुधवारी हैदराबादला जाणार आहेत. त्यानंतर ते बंगळुरुला जाणार आहेत.
दरम्यान कॉंग्रेसने १८ जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये आमदारांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या या बैठकीत आमदारांची संख्या निश्चित केली जाणार आहे. कॉंग्रेसचा एक आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये असून त्याच्याशी आमचा संपर्क होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तो आमच्यासोबतच असणार आहे, असा दावा कॉंग्रेसने केला आहे.