अफवांच्या बाजाराला चाप
खोट्या बातम्या आणि अफवा हे काही समाजमाध्यमं वापरणाऱ्यांसाठी नवीन नाही आणि सगळं माहीत असूनही डोळसपणे अजूनही हेच मजकूर पुढे फॉरवर्ड केले जातात. पण, या सगळ्याचा वाढता दुरुपयोग पाहता अखेर या सर्व अफवा रोखण्यासाठी महाराष्ट्रासह १० राज्यांत व्हॉट्सअॅपने जनजागृती करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारची जनजागृती समाजमाध्यमांना करावी लागते, कारण गेल्या वर्षभरात प्रकारच तसे घडले. खोटी माहिती पसरवून देशातील काही भागांमध्ये गेल्या महिन्याभरात अनेक मारहाणीचे प्रकार घडले. निरपराध लोकांना ठार मारण्याच्या घटना घडल्या, परिणामी अफवांचा प्रसार रोखण्यासाठी काहीतरी करा, असे म्हणून शासनाने या समाजमाध्यमांचे कान उपटले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या या समाजमाध्यमांनी रेडिओच्या माध्यमातून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही जनजागृती मोहीम २९ ऑगस्टपासून सुरू केली. हे सगळं सुरू असताना आता मात्र अशा घटना घडल्या तर, समाजमाध्यमं हाताळणाऱ्या कंपनींच्या उच्चाधिकाऱ्यांनाही उत्तर द्यावे लागू शकते, अशी शिफारस आता करण्यात आली आहे. शासनाने अशा घटनांवर आळा बसावा यासाठी एक समिती नेमली आणि त्या अंतर्गत, जर यापुढे तुम्ही कोणत्याही अफवा, फेक न्यूज, अश्लील मजकूर फेसबुक वा व्हॉट्सअॅपच्या माध्यमांतून पसरवत असाल तर, कडक शिक्षाही भोगाव्या लागतील. गेल्या एका वर्षात देशांत नऊ राज्यांमध्ये जमावाकडून ४० मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे आपण पाठवलेला एखादा मजकूर कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो, याचा विचार न करता केवळ, आपण या समाजमाध्यमांचा भाग आहोत, म्हणून डोळे झाकून काहीही पुढे फॉरवर्ड करणं बंदच केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर या मुद्द्यावर एक समिती गठीत केली गेली. यातील ५० टक्के घटना प्रामुख्याने व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांतूनच पसरणाऱ्या अफवांमुळेच घडल्याचे समोर आले. यामध्ये मुले पळवून नेणारी टोळी, प्राण्यांची तस्करी करणारी टोळी अशा आशयाचे मेसेज व्हायरल होत होते. या अफवांना बळी पडत जमावाकडून अनेकांना मारहाण करीत ठार करण्यात आले. या सगळ्यावरून मनुष्य हा सर्व प्राण्यांपेक्षा हुशार प्राणी आहे, हीसुद्धा अफवा आहे की काय, असं वाटायला लागलं तर आश्चर्य वाटायला नको.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/