नाव चार्ली स्पोर्टस क्लब आहे मात्र खेळासोबतच हे मंडळ विविध उपक्रम राबवत असते. लहान मुलांनी खेळ गट बनवत या मंडळाची स्थापना केली. आज २५ वर्षात त्या खेळगटाचा स्पोर्टस क्लब झाला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्याजवळ आपजा गाव आहे, तिथे आमच्या क्लबच्या एका सदस्याचे अजित चव्हाण यांचे फार्महाऊस आहे. तिथे एकदा गेलो होतो. आपजा गाव, आजूबाजूचे वनवासी पाडे, त्यांचे आजही तसेच हलाखीचे जगणे पाहिले. तेव्हा आम्हा सगळ्या मित्रांना वाटले की, आपण कोणत्या दुनियेत राहतो? हे जग कोणते आहे? आमचे अनुभव विश्व लहान होते, पण तरीही वनवासी समाजाचे जगणे पाहून आम्ही सगळे अंतर्बाह्य थरारलो. त्यामुळे या गावात आम्ही कित्येक वर्षे काही ना काही कल्याणकारी उपक्रम राबवत असतो. आता नाही म्हणायला थोडे फार बदल या पाड्यांमध्येही झाले आहेत. सरकारी योजना आता पोहचू लागल्या आहेत. किती अस्वस्थ करणारे आहे की, आपण शहरात सुखसुविधांमध्ये राहतो, पण आपल्यापासून थोड्याच अंतरावर हा इतका मोठा समाजगट असा वेगळा आणि समाजप्रवाहाबाहेर राहतो? ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे अध्यक्ष गणेश शेट्टी बोलत होते. विक्रोळी आणि या परिसरातील ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ हे तसे नामांकित आणि सर्वपरिचितच. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ची स्थापना कशी झाली? तर ३० -३५ वर्षांपूर्वी विक्रोळी कन्नमवार टागोरनगर परिसरामध्ये लहान लहान मुलांचा गट आपापसात क्रिकेटच्या स्पर्धा भरवत असे. त्यामध्ये आपल्या गटाचेही नाव असावे म्हणून मग ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ नाव ठेवून त्याकाळी लहान मुलांनी एक गट बनवला. त्या गटाच्या नावाने ते क्रिकेट किंवा तत्सम स्पर्धेत भाग घेऊ लागले. खेळ माणसाला खरे आयुष्य शिकवते आणि आयुष्यातले चढउतारही स्वीकारायला शिकवते. कालौघात ‘चार्ली स्पोर्टस क्लब’च्या नावाने एकत्र येऊन खेळणारी ही छोटी मुले मोठी झाली. विक्रोळीसारख्या कामगारनगरीचे त्याकाळचे वातावरण खूप वेगळे होते. तरुणांवर ‘अँग्री यंग मॅन’ची छाप होती. जरा काही झाले की, रक्त उसळणे ही प्रतिक्षिप्त क्रिया होणारच होणार. या सगळ्या वातावरणात ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ची मुलेही वयाने अनुभवाने वाढत होती. विक्रोळीत वेगवेगळी स्थित्यंतरे घडत होती. त्या पडसादात ‘चार्ली स्पोर्टस क्लब’च्या मुलांचे जगणेही बदलत होते. प्रत्येकाची कार्यक्षेत्रे विस्तारत होती. खेळाची चौकट मोडून आता प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक विश्वात गुंग झाला होता. त्याचवेळी ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे संस्थापक प्रकाश शेट्टी यांचे आकस्मिक निधन झाले. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’च्या छत्रछायेत एकत्र खेळलेले मित्र पुन्हा एकत्र आले. जुने मित्र एकत्र आले होते, पण आता त्यांना लुटूपुटीच्या खेळांमध्ये भाग घ्यायचा नव्हता, तर आता त्यांना त्यांच्या मित्राच्या म्हणजे मृत प्रकाश शेट्टी या स्मृतीखातर काही तरी करायचे होते.
त्यातूनच मग पुढे ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ने मुख्यत: काय केले, तर परिसरातील जनतेच्या समस्या समजून घेतल्या. त्या समजून घेताना त्रास होण्याचा प्रश्न च नव्हता. कारण ते या समाजाचा भाग आहेत. इथे त्यांना पहिला प्रश्न हा जाणवला की, सख्खे शेजारी असलेले लोक एकमेकांपासून मनाने दूर आहेत. कारण कुणालाही एकमेकांना भेटून सुखदु:खाच्या गोष्टी सांगण्यासाठी वेळच नाही. वेळ नाही म्हटल्यापेक्षा तसा विश्वासच नाही. हाय हॅलोपेक्षा कधीही कुणी एकमेकांशी जास्त संवाद साधतच नाही. हे समाजाच्यादृष्टीने चांगले नव्हतेच. कारण बंद दरवाजे आणि बंद मन यामुळे समाज कुढायला लागला आहे. या गोष्टींचा विचार करून ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ने परिसरात वेगवेगळे उत्सव साजरे करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये आवर्जून सगळ्यांचा सहभाग होईल असा कटाक्ष ठेवला गेला. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संवाद आणि संपर्क वाढला. मिळून पूजा करणे, उत्सव साजरे करणे यामध्ये परिसर एकत्र येऊ लागला. हा पूजा उत्सव केवळ एका विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी नाही, तर सर्वधर्मीय या पूजाउत्सवात सामील होतात. दुसरे असे की, विक्रोळीसारख्या कामगारवस्तीत कित्येकजणांचे स्वप्न असते की आपण धार्मिक स्थळांना भेटी द्याव्या, पण आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ते शक्य नसते. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’च्या लक्षात आले की परिसरातील कित्येकांना तिरूपती बालाजी देवस्थान किंवा अशाच प्रकारे इतरही देवस्थानांना भेट द्यायचे असते. पण इतक्या दूरवर जाणे, राहणे, खाणे आणि इतर व्यवस्था खर्चिक असते. तसेच एकट्याने जाणे सुरक्षित असेल का? हा ही एक प्रश्न असतो. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ने यावर एक उपाय केला. परिसरातील ज्यांना ज्यांना तिरूपती बालाजीला जायचे आहे, अशांना एकत्र केले. अमुक माणसांचा अमुक दिवसांचा सर्व खर्च किती होईल याची मोजणी केली. तितकेच पैसे सगळ्यांकडून घेतले गेले. तिरूपती बालाजी दर्शन करून आले की, पुन्हा सगळे एकत्र येतात आणि खर्च आणि जमा याचा हिशोब केला जातो. यामध्ये ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ विश्वस्ताची भूमिका निभावते. गेली कित्येक वर्षे ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ हा उपक्रम राबवत आहे. दरवर्षी २५० व्यक्ती या माध्यमातून तिरूपती बालाजीचे दर्शन घेत आहे. अर्थात, ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चा देवदर्शन घडवून आणणे हा काही व्यवसाय नाही. पण केवळ परिसरातल्या लोकांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून क्लब हा उपक्रम राबवत असतो.
काही दिवसांपासून ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ची एक जाहिरात सर्वत्र दिसते आहे की, टाकून दिलेल्या, जुन्या अडगळीत ठेवलेल्या, तुम्हाला नको असलेल्या सायकली अशा गंजत ठेऊ नका. भंगार बनवू नका. त्यापेक्षा तुमच्या अडगळीची सायकल कुणाचे तरी भाग्य बदलू शकेल, असे ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे आवाहन होते. वाटले स्पोर्टस क्लब आहे कदाचित सायकलिंग वगैरेच्या स्पर्धा ठेवायचा असा या क्लबचा विचार असेल. पण तसे काही नव्हते. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले, सायकलिंग स्पर्धा ठेवणे गरजेचे आहेच. पूर्वी म्हणजे साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी याच विक्रोळी आणि परिसरामध्ये एक सायकलवाला चाचा असायचा. तो सायकल शिकण्यासाठी थोडेफार शुल्क घेऊन सायकल चालवायला द्यायचा. मुले तेव्हा तशी सायकल शिकायची. आता परिस्थिती वेगळी आहे. सायकलवाला चाचाही नाही आणि घरात हौसेने विकत घेतलेल्या सायकलीही अडगळीत पडल्या. आता प्रत्येकाकडे स्वत:चे खाजगी वाहन आहे. लहान मुलांना शाळेतून आणायला सोडायला शाळेच्या बसेस आहेत. मुलांनी सायकलिंग करावे असे मोकळे रस्तेही नाहीत. बरे मुलांनाही तशी आवड राहिली असेल की, नाही हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे सायकलिंग स्पर्धा ठेवण्यासाठी ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ने सायकल मागवल्या नाहीत, तर आजही मुंबई सोडली की ठाणे रायगड भागातल्या वनवासी पाड्यात, खेड्यात शाळा-महाविद्यालये दूर आहेत. खेड्यातल्या पाड्यातल्या मुलांना ऊन वारा पावसात मैलोनमैल चालत जावे लागते. त्यांना या अडगळीत पडलेल्या सायकली दिल्या, तर किती उपयोग होईल. वस्तू ‘युज अण्ड थ्रो’ न करता त्यांचा वापर योग्य वेळी योग्य स्थळी झाला, तर त्या कधीही निरूपयोगी होत नाहीत.” गणेश यांचे म्हणणे बरोबर होते. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ची सगळी मंडळी व विक्रोळीमध्ये सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक क्षेत्रात काम करणारी मंडळी सुशिक्षित आणि संस्कारी. या सर्व मंडळींचा आपसात उत्तम वैचारिक समन्वय. त्यामुळे कधी कोणता उपक्रम राबवावा, याची निवडही मिळूनच होते. त्यामुळे ‘चार्ली स्पोर्टस क्लब’च्या उपक्रमांमध्ये वैविध्य आढळते. पासपोर्ट काढताना अडचण होऊ नये, म्हणूनही जागृती करणे, विविध सामाजिक समस्यांवर जागृती करणे, आरोग्य शिबिरे भरवणे, जाणीवजागृती शिबिरे भरवणे हे तर ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ करतेच; पण क्लबचा सर्वात आवडता उपक्रम आहे वृक्षारोपण. पर्यावरणदिनी वृक्षारोपण करणे यासाठी ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे सदस्य खूप तयारी करतात. वृक्षरोपणासाठी जागा शोधणे, तिथे कोणते रोप लावायचे? ते लावल्यानंतर त्याची निगा कोण कशी राखणार? याची योजना आखली जाते. त्याप्रमाणे सर्व सदस्य, त्यांच्यासोबत परिसरातील उत्साही नागरिक, विद्यार्थी भल्या पहाटे मोहिमेला निघतात आणि वृक्षारोपण करतात.
असो, गणेश शेट्टींना विचारले, “स्पोर्ट क्लबचे सध्याचे उपक्रम काय आहेत?” यावर ते म्हणाले,”विक्रोळी कांजूर लगत डंपिग ग्राऊंड झाले आहे. गेली काही वर्षे त्याचा खूप त्रास विक्रोळीकरांना होतो. हे डंपिंग हटवता येईल का? किंवा त्याचा त्रास कमी करता येईल का? यासाठी आमच्या ट्रस्टचे सदस्य विविध पद्धतीने काम करत आहेत. पाहू आता काय होते ते? तसेच प्लास्टिक बंदी मोठ्या जोरशोरमध्ये झाली, पण प्लास्टिकच्या बदल्यात काय? यावर उत्तरच नाही. आम्हाला असे वाटते की, यावर ठोस काही तरी उत्तर असायला हवे. पूर्वी काय प्लास्टिक बॅगाच होत्या का? आपण कापडी पिशवी वापरायचो. त्या पिशव्यांची सवय तुटली म्हणून आता आपल्याला प्लास्टिक बंदीची भीती वाटते. त्यासाठी खारीचा वाटा उचलत आम्ही २००० कापडी पिशव्यांचे वाटप करणार आहोत. प्लास्टिकच्या विरोधात जनजागृती करत आहोत. दुसरे असे की विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल असणे ही विक्रोळीकरांची गरज आहे. पण, किती वर्ष किती लोकांनी आणि संस्थांनी पाठपुरावा केला पण त्या पुलाचे काम रखडले आहे. त्या कामाचा पाठपुरावा सध्या आम्ही करत आहोत.” ‘चार्ली स्पोर्टस क्लब’चे काम समाजसेवेचे व्रत अंगीकारलेल्या सेवाभावी संस्थेसारखेच आहे. पण तसे जरी असले तरी प्रत्येक उपक्रमाला आर्थिक पाठबळ तर लागतेच. ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ त्यासाठी काय करते? असे विचारल्यावर गणेश म्हणाले, “आमचे सर्व सदस्य सामाजिक आणि आर्थिक पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या उपक्रमांसाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे, पक्षाकडे किंवा इतर कुणाकडेही हात पसरत नाही. सगळे उपक्रम आम्ही आपसात खर्च वाटून घेऊन करतो. कारण सगळे उपक्रम आम्ही आम्हाला वाटते म्हणून करतो. ती आमची भावनिक गरज आहे. तसेच आमची सामाजिक बांधिलकी जपण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळे दुसर्यांनी त्याचा खर्च का उचलायचा? शेवटी माणूस म्हणून समाजात जगताना त्या समाजाचे ऋण फेडायला हवेच ना? ‘चार्ली स्पोर्टस क्लब’ म्हणून आम्ही असे मानतो की, आपल्याला होईल तितके दुसऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यायला हवे. राजकपूर साहब कह के गये ना...
किसी का दर्द हो सके तो ले उधार.. जिना उसी का नाम है।”