वाढती बेरोजगारी ही प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या विकसित देशातसुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढले की, सरकारची डोकेदुखीही वाढत असते. याच जागतिक परिस्थितीवर आधारित २०१८ मध्ये रोजगाराची स्थिती कशी असेल, याचा अहवाल ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’कडून सादर करण्यात आला. या अहवालानुसार अस्थिर व अशाश्वत अशा नोकर्या जगभरात १ .४ अब्ज असून यापैकी ३९ .४ कोटी रोजगार एकट्या भारतात आहेत. यावरून येणार्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. या अहवालानुसार भारताचा बेरोजगारीचा दर जरी ३ .५ टक्के असला, तरी इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त अस्थिर आणि असुरक्षित कामगारांची संख्या भारतात आहे. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असणार्या चीनचा बेरोजगारीचा दर चक्क भारतापेक्षा जास्त आहे. चीनमधील बेरोजगारी वाढून त्याचा दर ४ .७ वरून ४ .८ टक्के होईल, असा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्किल इंडिया’ यांसारख्या योजनांचा फायदा रोजगार निर्मितीसाठी होत असला तरी, असुरक्षित आणि अस्थिर कामगारांचा प्रश्न कायम आहेच. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आर्थिक वाढ होणार असल्याचा अंदाज जरी या अहवालातून वर्तविण्यात येत असला तरी, १ .४ अब्ज असुरक्षित कामगारांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतो. रोजगाराचे प्रमाण जास्त असले तरी, भारत, बांगलादेश, कंबोडिया व नेपाळमधील ९० टक्के कर्मचारी अस्थिर आहेत. त्यामुळे इतर खंडांपेक्षा आशिया खंडात नोकरीची अशाश्वतता आणि सोयीसुविधांची वानवा यामुळे कर्मचारीवर्ग भरडला जात आहे. या अहवालानुसार केवळ रोजगारीचे प्रमाण वाढत असले तरी उत्पन्नाचा दर्जा मात्र कमी असल्याचे नमूद करण्यात आले. बांगलादेश, कंबोडिया, नेपाळ या देशांमधून मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग स्थलांतर करत असतो. पण, हे केवळ कामगारांचे स्थलांतर नसून ही आर्थिक स्थलांतराची समस्या बिकट होऊन बसली आहे आणि याचा फटका सर्वच देशांना बसत आहे.
२०१७ ते २०१९ या कालावधीत भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७७ टक्के कर्मचारीवर्गावर ही बेरोजगारीची टांगती तलवार असणार आहे. या अहवालातील एक समाधानकारक गोष्ट म्हणजे, भारतीय अर्थव्यवस्था ही दक्षिण आशियातील आर्थिक व्यवहारांना चालना देत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान, तसेच दळणवळण क्षेत्रामध्ये भारतात चांगलीच रोजगारवाढ झाली आहे. पण, बेरोजगारीचे एकूण प्रमाण बघता अस्थिर बेरोजगारीचे प्रमाणही भारतात जास्त आहे. आशिया खंडात स्वयंरोजगार, कौटुंबिक व्यवसायातला रोजगार, कृषिक्षेत्रातील रोजगार या क्षेत्रात रोजगारांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्याना रोजगाराची योग्य हमी, सोयीसुविधा तसेच सुरक्षा या बाबींपासून वंचित राहावे लागते, तर काही देशांमध्ये कृषी, बांधकाम, घाऊक तसेच किरकोळ व्यापार क्षेत्रातही असंघटित रोजगार मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याचे या अहवालात म्हटले आहे. एकूणच भारताचा विकासदर वाढत असला तरी, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच. कामासाठी आवश्यक असणारे चांगले वातावरण आणि पुरेशी सुरक्षा यांच्या कमतरतेमुळे कर्मचारीवर्ग यात त्रासला जातोय. गेल्या एक-दोन दशकांत सेवाक्षेत्रांत रोजगाराच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, ‘असुरक्षित’ रोजगाराचा दबदबा आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्या काळात जगभरातील कर्मचाऱ्याना सुखसोयींपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता बळावली आहे.