नवी दिल्ली : भारताचे पहिले मानवासहित अंतराळयान लवकरच अवकाशात झेप घेणार आहे. गगनयान असे या अंतराळयानाचे नाव असून त्यातून ३ अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत. ७ दिवसांसाठी हे अंतराळवीर अवकाशात राहणार आहेत. हे अंतराळयान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ३००-४०० किमी अंतरावर ठेवले जाणार आहे. अणुऊर्जा व अवकाश राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गगनयान अंतराळात सोडण्याआधी दोन मानवरहित अंतराळयान अवकाशात झेपावणार आहेत. २०२२ च्या आधी हे मिशन पूर्ण होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण मिशनसाठी १०,००० कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च येणार आहे. या वर्षी स्वातंत्र्यादिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गगनयान मिशनची घोषणा केली होती. २०२२ ला आपला तिरंगा अवकाशात फडकेल असे पंतप्रधान त्यावेळी म्हणाले होते.
हे गगनयान अवकाशात झेपावले की मानवासहित अंतराळयान अवकाशात पाठवणारा भारत हा जगात चौथ्या क्रमांकाचा देश ठरेल. अशी महिती जितेंद्र सिंह यांनी दिली. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इस्त्रो भारताच्या मित्र देशांच्या अवकाश संस्थांची व त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.