व्हेनेझुएलाचे ‘बोलिव्हर’ हे चलन पुरते कोसळले आहे. जागतिक नाणेनिधीच्या माहितीनुसार, ‘बोलिव्हर’च्या कोसळण्याचा दर हा तब्बल एक दशलक्ष टक्के इतका प्रचंड आहे. त्यामुळे जर्मनीमधील १९२० च्या आणि झिम्बाब्वेच्या २००० सालच्या आर्थिक संकटांच्या पातळीवर व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सध्या पोहोचली आहे. त्यातही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या नाकर्तेपणामुळे देशावर हे ‘न भुतो...’ असे अर्थसंकट कोसळले. बोलिव्हरची दुर्दशा पाहता, व्हेनेझुएलामध्ये ‘बोलिव्हर सोबरानो’ हे एक लाख जुन्या बोलिव्हर चलनासमान नवीन चलन सुरू करण्यात आले. तोपर्यंत हा कारभार ‘पेट्रो’ या क्रीप्टोकरन्सीच्या भरवशावर कसाबसा हाकला जात होता. पण, अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. पोतीच्या पोती पैसे घेऊन व्हेनेझुएलाचे नागरिक मिळेल त्या वस्तू खरेदी करताना दिसतात. महागाईने उच्चांक गाठला असून दर २६ दिवसांनी वस्तूंचे दर गगनाला भिडणारे आहेत. व्हेनेझुएलाचे ९० टक्के नागरिक गरिबीत जीवन कसेबसे कंठत आहेत, तर ६० टक्के नागरिकांवर खिशात पैसेच नसल्यामुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे. फक्त अन्नधान्य पुरवठाच नाही तर औषधांच्या पुरवठ्यावरही या आर्थिक संकटाचा दुष्परिणाम झालेला दिसतो. आधीच अपुर्या वैद्यकीय सोयीसुविधा व त्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशात रोगांनीही थैमान घालायला सुरुवात केली. हे कमी काय, म्हणून व्हेनेझुएलाची आयातही तब्बल ५० टक्क्यांनी घटली आहे. सरकारी तिजोरीत एकीकडे खडखडाट असल्यामुळे संपूर्ण देशभर गोंधळाचे वातावरण असून त्याचा फायदा समाजकंटकांनी घेतलेला दिसतो. गेल्या वर्षभरात व्हेनेझुएलामध्ये तब्बल २७ हजार लोकांचे खून झाले असून गुन्हेगारीच्या यादीतही हा देश आता जगभरात दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.
कळस गाठलेली महागाई, अन्न-धान्याचा तुटवडा, गुन्हेगारीकरण, चलनटंचाई यांसारख्या समस्यांच्या विळख्यात जखडलेल्या व्हेनेझुएलामधून नागरिकांनी स्थलांतर करून किमान जिवंत राहण्यासाठी इक्वेडोर, चिली, पेरू, कंबोडिया, ब्राझील यांसारख्या शेजारी देशांत धाव घेतली. व्हेनेझुएलाच्या स्थलांतरितांचा ओघ इतका प्रचंड आहे की, २००५ पासून १ .६ दशलक्ष नागरिकांनी आपल्या देशाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकट्या पेरूमध्ये आजवर चार लाख व्हेनेझुएलन नागरिकांनी स्थलांतरित म्हणून प्रवेश केला असून ही संख्या आगामी काळात अजून वाढण्याची शक्यताही आहेच. एखादा देश स्थलांतरितांचे लोंढे एका मर्यादेत मानवतेच्या नात्याखातर स्वीकारतोही. पण, याच स्थलांतरितांचे लोंढे जेव्हा स्थानिकांपेक्षा वरचढ ठरू लागतात, त्यांच्या सोयीसुविधांच्या आड येऊन आपली संस्कृती-धर्म लादण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र ते अराजकाला निमंत्रण देतात. युरोपमध्ये ते चित्र आपण पाहतोच आहोत. तशीच स्थिती आता द. अमेरिकेतही उद्भवण्याची चिन्हे आहेत. एखाद्या खंडातील एक देश जरी अशाप्रकारे अराजकाचा उंबरठा ओलांडतो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम त्या देशासह साहजिकच शेजारी देशांनाही भोगावे लागतात. त्यामुळे वेळीच परस्पर सहकार्य आणि शांतता यांचे धोरण व्हेनेझुएलाने अवलंबिले असते, तर कदाचित ही भीषण परिस्थिती त्यांच्यावर ओढवली नसती. कारण, अशा देशबुडीतून पुन्हा कुठल्याही देशाला सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय गत्यंतर नाहीच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/