अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्राहक यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात लवकरच 'वावर' या महत्त्वकांक्षी उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. शेतामध्ये पिकणारे ताजा शेतमाल ग्राहकांना योग्य दरामध्ये मिळावा व यातून ग्राहक आणि शेतकरी या दोघांचेही हित व्हावे, हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा असणार आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनामध्ये या उपक्रमाविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरीता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाईट या सारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात ‘वावर’ च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. एकंदरीत ‘वावर’ हा अकोला जिल्हयाचा कायापालट करणारा उपक्रम ठरणार आहे, असा विश्वास पाण्डेय यांनी व्यक्त केला.
‘शेतकरी ते ग्राहक’ ही ‘वावर’ची टॅगलाईन आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देऊन आत्महत्यांचे प्रमाण घटविण्याकरीता जिल्हा प्रशासनाने ‘वावर’चा उपक्रम हाती घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, यासाठी ‘वावर’ नावाने सहकारी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित केले आहे. प्राथमिक स्तरावर ‘वावर’च्या संदर्भातील कामकाज पूर्णत्वास गेले आहे. लवकरच सर्व बाबींची पूर्तता करुन ‘वावर’ क्रियान्वीत करण्यात येणार आहे.