सभागृहाच्या पायरीवर बसून राष्ट्रवादीचे आंदोलन
नागपूर : खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याविषयी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जोरदार टीका केली आहे. 'सरकारने हमीभाव वाढीविषयी केलेली घोषणा हे निवळ आश्वासनांचे गाजर असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा नवीन जुमला उभारला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. तसेच अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने सभागृहाच्या पायरी बसून सरकारविरोधात आंदोलन देखील केले.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी यावर टीका करत, मोदी सरकारने निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना हमी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या चार वर्षांमध्ये सरकारने सातत्यने शेतकरी विरोधी धोरण देशात राबवले आहे. त्यात हमीभावामध्ये वाढ करण्याविषयी घेतलेल्या निर्णयामध्ये देखील मोठी वाढ सध्या दिसत नाही. म्हणून हा फक्त निवडणुकीसाठी उभारलेला नवीन जुमला असून यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये कसलाही बदल होणार नाही, अशी टीका मुंडे यांनी केली आहे. तसेच ऐननिवडणुकीच्या तोंडावर हमीभावात वाढ करण्याविषयी सरकारने केलेल्या घोषणेवरून हे सिद्ध होते कि, सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला आहे.
देशातील शेतकऱ्यांना आपल्या लागवड खर्चापेक्षा शेतमालावर दीडपट अधिक भाव मिळावा, यासाठी म्हणून केंद्र सरकारने खरीप हंगामातील काही प्रमुख पिकांची दर यादी काल जाहीर केली आहे. यामध्ये नाचणी, बाजरी, सुर्यफुल, कापूस, ज्वारीसह एकूण १५ पिकांच्या हमीभावामध्ये साडे तीन टक्के ते पन्नस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. परंतु विरोधक मात्र यावरून देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.