आतापर्यंत १२ महापौर, काहींनी घालवली प्रतिष्ठा
जळगाव, ३० जुलै
जळगावला नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर महापालिकेत सत्तेवरील खान्देश विकास आघाडीने गेल्या १५ वर्षात केवळ राजकीय तडजोड आणि आपली लोकप्रियता सांभाळण्यासाठी खैरातीसारख्या वाटलेल्या महापौरपदाची अपवाद वगळता इतरांनी प्रतिष्ठाच घालवल्याचे दिसते.
व्यक्तीची योग्यता नव्हे, तर खान्देश विकास आघाडीची हतबलता दरवेळी दिसून येत होती आणि केवळ राजकीय तडजोड आणि सत्ता टिकविणे एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून इथे महापौरपद दिले जात होते. या सर्व महापौरांकडे दृष्टीक्षेप टाकला तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. या शहराचा, प्रशासनाचा, शहरातील नागरिकांच्या अपेक्षांचा आणि शहरभरातील विविध समस्यांचा अजिबातच अभ्यास नसलेले महापौर जसे या नगरीने पाहिले आहेत तसेच अत्यंत अभ्यासू, समस्यांची जाण असलेले, नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग शोधणारे महापौरही होते. मात्र, ही संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.
खरे तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे तो दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, करतो काय आणि समाजमनात त्याच्याबद्दल काय भावना आहेत? या गोष्टींना अधिक महत्त्व असते. याच अनुषंगाने महापौराची निवड केली जाते. खाविआच्या काळात मात्र, एखादा नगरसेवक रुसला की, कर त्याला महापौर असे ‘बालसुलभ’ प्रकारही घडलेत. बरे, तो नगरसेवक निष्ठावंत असेल तर गोष्ट वेगळी? परंतु, या पदाच्या लालसेनेच आलेल्या अनेकांना खाविआने ‘सांभाळून’ घेतले, हे कितपत योग्य आहे? काहींना तर अचानक ‘लॉटरी’ लागावी असे हे पद मिळाले. ती सुध्दा गंमतच आहे. ध्यानीमनी नसताना, प्रशासनाचा काही एक अनुभव नसताना नगरसेवकाचे थेट महापौर आणि खाविआच्या नेत्यांच्या सोयीसाठी पुन्हा नगरसेवक झालेल्यांना काय वाटले असेल हे तेच जाणोत? शहराचा चेहरा आणि ओळख जर महापौर असेल, तर हे जळगावचे महापौर आहेत, असे सांगताना अनेकांच्या बाबतीत खाविआच्या नेत्यांना खरोखर मनापासून आनंद झाला असेल का? पण हे वास्तव आहे, ते नाकारून
चालणार नाही.
राजकीय तडजोडीतून अयोग्य व्यक्तीही बनल्या महापौर
या १५ वर्षात महापालिकेत एकूण १२ जणांनी महापौरपद भूषविले. दरवेळी सत्ता खान्देश विकास आघाडीच्याच ताब्यात असल्याने संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण, व्यवसाय, अनुभव आदी बाबी नजरेआड करून केवळ राजकीय तडजोड म्हणून अयोग्य व्यक्तींनाही या पदावर बसविल्याचे दिसते. त्यामुळे एकूणच, जळगाव महानगरपालिकेचे महापौरपद हा एकेकाळी अत्यंत चर्चेचा आणि कुचेष्टेचा विषय ठरला होता.
आतापर्यंत १२ महापौर
आशाताई कोल्हे
तनुजा तडवी
रमेशदादा जैन
प्रदीप रायसोनी
अशोक सपकाळे
सदाशिवराव ढेकळे
विष्णु भंगाळे
जयश्री धांडे
किशोर पाटील
राखी सोनवणे
नितीन लढ्ढा
ललित कोल्हे