सत्ताधार्‍यांनी घातले जळगावकरांना खड्ड्यांत

    31-Jul-2018
Total Views | 5
 

 
सत्ताधार्‍यांनी घातले जळगावकरांना खड्ड्यांत
 
जळगाव शहरात मूलभूत समस्यांची वानवा असून सध्या शहरात जटिल समस्या बनली आहे ती रस्त्यांची. शहरातील रस्त्यांची स्थिती सध्या अशी आहे की, हा रस्ता आहे की, चाळणी अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे. शहरात महापालिकेकडून नागरिकांना पाणी, स्वच्छ गटारी, पथदिवे या मूलभूत समस्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, सध्या खड्डेमय रस्त्यांची समस्या नागरिकांच्या नाकी नऊ आणत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर महापालिकेने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी विविध कॉलन्यांमधील रहिवाशांची मागणी होत आहे. जळगाव शहरात चौपदरीकरणाचे काम रखडले असतानाच विविध कॉलन्यांमधील खड्डेमय रस्त्याची समस्या नागरिकांच्या जीवावर उठली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहनधारकांना वाहने चालवताना जिकरीचे ठरत असून यामुळे त्यांना पाठीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉलन्यांमध्ये असणार्‍या रस्त्यात केवळ डबर व खडीचा कच टाकून वेळ मारून नेण्यात येत होती. मात्र, आता तर चक्क मुरूम टाकून महापालिका आपल्या जबाबदारीतून हात झटकत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगाव शहरातचा विस्तार झपाट्याने वाढला असून वेगवेगळ्या कॉलन्यांचा नव्याने विस्तार झाला आहे. या विस्ताराबरोबर नागरिकांना मूलभूत समस्या पुरवण्याबाबत मात्र महापालिका आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. जळगाव शहरात निमखेडी परिसरापासून ते आसोदा रोड आणि जैनाबाद परिसरापासून ते संभाजीनगर व मोहाडी या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून महापालिकेने रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा विचार करून योग्यरितीने काम करणे गरजेचे आहे, पण तसे होत नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण होत असल्याचे तरूण भारतच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचेही नुकसान होऊन किरकोळ आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता बळावली असताना महापालिका मात्र यावर काहीही उपाययोजना करायला तयार होत नसल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केवळ दगड, माती टाकून रस्ते जर महापालिका तयार करत असेल तर आम्ही कर का भरायचा असा सवालही नागरिक करताना दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावरून पादचार्‍यांना चिखल तुडवत चालावे लागत असल्याची भयावह परिस्थिती असते. त्याचप्रमाणे या रस्त्यात वाहनधारकाचे जर चाक रूतले तर त्याचा छोटा मोठा अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तरी महापालिकेेने यावर मार्ग काढून नागरिकांना दिलासा देऊन टेन्शनमुक्त रस्ता निर्माण करावा, त्याचबरोबर योग्य त्या इंजिनिअरला हे काम करण्यासाठी द्यावे. दरम्यान, जर कॉलन्यांमधील रस्ते जर पुन्हा पुन्हा खड्डेमय होत असतील तर होणार्‍या कामात भ्रष्टाचार होत आहे, हे मनपाला समजले पाहिजे. त्यांनी कोणत्याही कामाला सुरुवात होताच तेथे जाऊन कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीचे साहित्य वापरतो आहे की नाही, याचीही चाचणी करायला हवी. तेव्हाच जळगावकरांना चांगल्या रस्त्याची अनुभूती जळगाव शहरातील नागरिकांना देण्यात महापालिका यशस्वी ठरेल, यात शंका नाही.
दरम्यान, पालिकेच्या रस्त्यात खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था निर्माण झाली असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. यापुढे महापालिकेला कर हवा असेल तर जोपर्यंत नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाही, तोपर्यंत कर न देण्याचा निर्णय काही नागरिकांनी तरूण भारतने संवाद साधल्यानंतर सांगितले. महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणही नागरिकांनी केली आहे.
 
विकासासाठीचा निधी गेला कुठे...
महापालिकेने व सत्ताधार्‍यांनी आतापर्यंत कॉलन्यांमधील रस्त्याची अवस्था सुधारायला काहीच हरकत नव्हती. शहराच्या विकासासाठी जो निधी आला मग तो कुठे गेला, असा सवालही आता जळगावकरांकडून होत आहे. नगरसेवक केवळ मते मागण्याच्या कामाचे असून त्यांना आपल्या प्रभागातील नागरिकांशी काही देणेघेणे नसल्याची तीव्र भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
आधीच अरुंद असलेल्या रस्त्यात खड्डे असल्याने वाहनधारक आणि पादचार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकारही नित्याचे झाले असून किरकोळ अपघात होऊन हाणामारीच्या घटनाही घडत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणाचा त्याचबरोबर डिव्हायडरमध्ये सुशोभिकरणासाठीही महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. तेव्हाच जळगाव सुजलाम् सुफलाम् होऊ शकते, असे नागरिकांकडून सांगण्यात आले.
 
 
सत्ताधारी केवळ आपली भाकरी भाजतात
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून याकडे महापालिका व सत्ताधारी मात्र बघण्यासही तयार होत नाहीये. सत्ताधार्‍यांनी गेल्या काही वर्षात नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे न पाहता, केवळ आपल्या भाकरी भाजण्याचे काम केले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक जणाने मत मागताना आश्‍वासनांची खैरात वाटली होती, पण निवडणुका संपून नंतर कोणी तोंडच दाखवले नसल्याची खंत जैनाबाद, कांचननगर, समतानगर, खोटेनगर, शिव कॉलनी आदी परिसरातील नागरिकांशी तरूण भारतने संवाद साधल्यानंतर त्यांनी व्यक्त केली. रस्ते, पाणी, गटारी, कचरा संकलन, पथदिवे आदी मूलभूत समस्याही जर महापालिका पुरवत नसेल तर आम्ही कोणताही कर भरणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न हा केवळ नागरिकांसाठी नाही तर सत्ताधार्‍यांसाठीसुद्धा कळीचा मुद्दा बनलेला आहे. पण, आपणच सत्तेत असताना महापालिकेत जाऊन हा प्रश्‍न मांडेल कोण, आणि मांडलाच तर प्रभागासाठी निधी देणार कोण, असाही प्रश्‍न आहे. यात तोंड दाबून बुक्क्याचा मार मिळत असल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. दरम्यान आपण सत्तेत असताना असे केल्यास महापालिकेला घरचाच आहेर देण्याचा प्रकार होणार असल्याचे काही नगरसेवकांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर तरूण भारतला सांगितले. दरम्यान, हा असा प्रकार जर होत असेल तर नागरिकांच्या हक्कासाठी कोण लढेल, असा प्रश्‍न आहे.
 
यात राजकारण तर शिजत नाही ना...
जळगावातील रस्त्यांची स्थिती इतकी वाईट झाली आहे की, यातून वाट काढणेही जिकरीचे ठरत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यातून जाताना चिखल तुडवत चालावे लागते. दरम्यान, आम्ही राहत असलेल्या परिसरात तर दगड आणि मुरूम टाकून केवळ रस्त्याच्या नावाने महापालिकेने वेळ मारून नेली आहे. जर महापालिकेला कामच करायचे नसेल तर ही नाटके तरी का, असा सवाल आहे. दरवर्षी महापालिकेला शहर विकासासाठी निधी पुरवण्यात येतो. त्यातील काही रक्कम जर या कामात लावण्यात आली तर बर्‍यापैकी जळगावनगरी ही सुवर्णनगरी दिसेल. पण, जाणूनबुजून महापालिका आणि सत्ताधार्‍यांना शहराचा विकास करायचा नाही का, असा सवाल आहे. यात कोणते राजकारण तर शिजत नाही ना, असा संशयही बळावत असल्याची शक्यता आहे.
- सुभाष गोपाळ, नागरिक
 
 
वाहनधारकांचे कंबरडे मोडले
जळगावातील शहरातील रस्त्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून यावर महापालिका काहीच करत नसल्याची स्थिती आहे. महापालिकेला जर रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम जमत नसेल तर त्यांनी किमान खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवताना अक्षरशः कंबरेला त्रास होऊन याचा परिणाम शरीरावर होत आहे. महापालिकेने व सत्ताधार्‍यांनी नागरिकांना सुविधा देण्याचे वचन दिले होते, ते हवेतच विरले आहे. पण यावर लवकरात लवकर उपाययोजना करून या नरकमय यातनेतून आता सुटका करावी,
अशी मागणी आहे. - कुश पवार, नागरिक
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121