इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणूकसाठीची मतमोजणी सुरु झाली असून आज सकाळपासून या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. आज पाकिस्तानच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. सध्या सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीनुसार माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इंसाफ हा पक्ष आघाडीवर आहे. तेहरीक-ए-इंसाफ हा पक्ष विजयी झाला तर इम्रान खान हेच पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत.
सध्या इम्रान खान यांचा पक्ष ६४ जागांवर तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष ४६ जागांवर आहे. आजच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये झुंज पाहायला मिळत आहे. २७२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला १३७ जागा मिळतील त्या पक्षाचा उमेदवार पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात येईल.
सत्तर वर्षांमध्ये २९ पंतप्रधान परंतु एकाचाही कार्यकाळ पूर्ण नाही
१९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे भारताबरोबरच सध्या पाकिस्तानला देखील ७० वर्ष पूर्ण होत आहेत. मुस्लीम समाजाला गुण्यागोविंदाने आणि भारतापेक्षा अधिक उत्तम राहता यावे म्हणून मोहम्मद अली जीनाने पाकिस्तानची निर्मिती केली. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या ७० वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही नांदू शकलेली नाही. पाकिस्तानच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये या देशामध्ये तब्बल २९ पंतप्रधान झाले आहेत. परंतु यातील एकाही पंतप्रधानाला आजपर्यंत आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. तसेच पाकिस्तानमध्ये सर्वाधिक काळ लष्करी हुकुमशाहीच राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही टिकू शकलेली नाही.