राणीच्या बागेतील ५ मगरी आणि १५ माकडांचे तात्पुरते स्थलांतर

    25-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : भायखळा येथील ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान‘ आणि प्राणिसंग्रहालयाचे (राणीची बाग) नूतनीकरण करण्यात येत आहे. प्राण्यांसाठी नवीन पिंजरे बांधण्यात येणार असून त्यासाठी प्राण्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये राणीच्या बागेतील पर्यटकांना प्रवेश नसलेल्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये ५ मगरी आणि १५ माकडांचा समावेश आहे. पाच मगरींमध्ये दोन माद्या आणि तीन नरांचा समावेश आहे तर पंधरा माकडांमध्ये पाच नर, चार पिल्‍ले, सहा माद्यांचा समावेश आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी दिली.
 

मगरींचे स्थलांतर करताना मगरींच्या पुढील दोन पायाखाली कॉटनच्या दोरीचा फास टाकला जातो. त्यामुळे मगरीला हलता येत नाही. मगरीला उचलून प्राण्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या १० फूट खोक्यामध्ये टाकले जाते. ते खोके टेम्पोमध्ये टाकून क्‍वारंटाइन परिसरात आणण्यात आले. खोक्यातील मगरींना पिंजर्‍यात सोडण्यात आले, तर माकडांना खाण्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे लावलेल्या वाहतुकीच्या खोक्यात ते येतात. त्यानंतर ते खोके टेम्पोमध्ये टाकून फोरेटाईन येथे आणून येथील पिंजर्‍यात सोडण्यात आले, असेही कोमल राऊळ यांनी सांगितले.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचा कायापालट करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे नवीन पिंजरे बांधून दुर्मीळ प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत.

 

दीड वर्षात नूतनीकरण

पिंजर्‍यांचे नूतनीकरण येत्या दीड वर्षात होणे अपेक्षित आहे. नूतनीकरण झाल्यानंतर टप्पाटप्याने प्राण्यांना नवीन पिंजर्‍यांमध्ये हलविण्यात येईल.

संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय