नागपूर : राज्यातील टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि या सर्वांमुळे वाहनचालकांचा वाया जाणारा बहुमूल्य वेळ यावर उपायासाठी फास्टॅग यंत्रणा राज्यात राबविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य किरण पावसकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. येरावार म्हणाले, फास्टॅग यंत्रणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत पथकर स्थानकांवर राबविण्याच्या दृष्टीने आयएचएमसीएल सोबत आर्थिक व तांत्रिक बाबींवर चर्चा सुरु असून सामंजस्य करार करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर फास्टॅग यंत्रणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत सर्व पथकर नाक्यांवर कार्यान्वित करण्यात येईल. केंद्र सरकारने दि. १ डिसेंबर २०१७ पासून फास्टॅग यंत्रणा सर्व वाहनांना बंधनकारक केलेली आहे. ही यंत्रणा संपूर्ण देशात वापरण्यात येणार असून महामंडळामार्फत राज्यात ही यंत्रणा वापरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचेही येरावार यांनी सांगितले.