नोएडात राहणाऱ्या हरप्रीत अहलुवालिया यांना सुरुवातीपासूनच मातीची भांडी तयार करण्याची आवड होती. पण, मुळातच कलाकार असलेल्या हरप्रीत केवळ मातीची भांडी तयार करुन थांबणाऱ्याणतल्या नव्हत्या, तर त्यांना आपल्या धरणीमातेसाठी, प्राणी-पक्ष्यांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून काहीतरी करायची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी ‘अर्थली क्रिएशन्स’ची स्थापना केली आणि आपली कल्पना सत्यात उतरवली. मानवाने आज पृथ्वीवरील बऱ्याथचशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपल्या स्वार्थासाठी नाश केल्याचे आपण पाहतो. परिणामी, माणसाच्या या कृत्यामुळे कित्येक प्राणी-पक्ष्यांचे, वृक्षजातींचे अस्तित्व धोक्यात आले. हरप्रीत यांना अशा प्राणी-पक्ष्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून संदेश देता येईल, असे वाटले आणि त्यांनी अस्तित्व धोक्यात आलेल्या, त्याचबरोबर इतर सर्वच प्राणी-पक्ष्यांच्या आकारांच्या टेराकोटा कुंड्यांची निर्मिती सुरु केली. या कुंड्यांच्या निर्मितीने, बाग-बगिच्यांत-घरांत सुशोभिकरणासाठी त्यांचा वापर केल्याने लहान मुलांसह, मोठ्या माणसांच्या मनातही प्राणी-पक्षी-वृक्षांच्या संरक्षण-संवर्धनाचा संदेश जाईल, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. शिवाय आपला हा उद्योग सुरु करतानाच हरप्रीत यांनी ४० कुंभारकाम करणाऱ्या कामगारांसोबत घेत त्यांच्या हातालाही काम दिले. तसेच त्यांच्या परिवाराची, मुलांचीही जबाबदारी घेतली.
पुढे हरप्रीत यांच्या कलाकृतीत सौंदर्य आणि गुणवत्ता दोन्हीही दिसल्याने लोकांनाही प्राणी-पक्ष्यांच्या आकारातील कुंड्या आवडू लागल्या व शहरांत ठिकठिकाणी त्यांनी तयार केलेल्या कुंड्या विराजमान झाल्या. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवलेल्या आणि गार्डनिंग अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल स्पेसमध्ये प्राविण्य मिळवलेल्या हरप्रीत यांची ही यात्रा सुरु होऊन आता १० वर्षे झाली आहेत. या १० वर्षांत त्यांचा आतापर्यंत १ लाख लोकांशी संबंध आला. या सर्वांचेच ध्येय जगाला सुंदर आणि नैसर्गिक स्थितीत ठेवण्याचे, प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करण्याचे, वृक्षांचे संवर्धन करण्याचे आहे. हरप्रीत यांनी आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक प्रकारच्या संकल्पनेने वेगवेगळ्या आकारातील कुंड्या तयार केल्या असून, त्यात मुख्यत्वे प्राणी, पक्षीरुपी कुंड्या, वॉटर बॉडीज आणि पक्ष्यांच्या घरट्यांचा समावेश आहे. हरप्रीत यांनी या सर्वच कुंड्यांना सर्वसामान्य व्यक्ती घेऊ शकतील, अशाच दरांमध्ये उपलब्ध करुन दिले आहे, जेणेकरुन अधिकाधिक लोक त्यांचा वापर करतील आणि सर्वांपर्यंत प्राणी-पक्षी-वृक्ष संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचेल.