मुंबई: या वर्षीपासून आठवी आणि दहावीच्या पुस्तकात पर्यावरण जागृतीसाठी दोन स्वतंत्र धड्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यातून पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे. घराघरामध्ये पर्यावरण संतुलनाचे महत्त्व, माहिती घराघरात पोहोचावी, पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने इयत्ता आठवी आणि दहावीच्या पुस्तकात संतुलित पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारे धडे समाविष्ट केले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संतुलित पर्यावरणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे.
आठवीच्या अभ्यासक्रमात ‘प्रदूषण’ आणि ‘इको सिस्टिम’ असे दोन धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. प्रदूषण या धड्यात प्रदूषण, त्याचे प्रकार, प्रदूषणाची निर्मिती, याबरोबरच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत माहिती देण्यात आली आहे. याच धड्यात कचर्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करणे कसे आवश्यक आहे, टाकाऊ, टिकाऊ आणि प्रदूषणकारक वस्तू यांचीही माहिती या धड्यात आहे. आज हवेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय असंतुलन होते अशा वेळी हवा गुणवत्ता
निर्देशांक, आम्लवर्षा आणि प्रदूषण अधिनियम आणि कायदे यांची माहिती या धड्यात देण्यात आली आहे. तर दुसरा धडा हा पूर्णपूणे ‘इको सिस्टिम’वर आधारित आहे. सध्याची स्थिती, वेगवेगळे प्रकार आणि वेळोवेळी करण्यात आलेले सर्वेक्षण, बदलेली स्थिती जसे वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, शहरीकरण, वाढत गेलेले पर्यटन, लोकसंख्यावाढ, संसाधनाचा वाढलेला वापर यामुळे इकोसिस्टिम कशी आहे याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयामध्ये दोन स्वतंत्र धडे पर्यावरणावर आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा पर्यावरणामुळे निर्माण झालेली आपत्ती याबाबत माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमामधील पर्यावरणावर आधारित हरित ऊर्जेच्या दिशेने आणि पर्यावरणीय व्यवस्थापन असे दोन धडे पर्यावरणावर देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती येण्याचे वेगवेगळे प्रकार, आपत्कालीन कृती, आपत्ती निवारण कक्षाचे महत्त्व, मॉकड्रिल्सबरोबरच प्रथमोपचाराचे महत्त्व देण्यात आले आहे.
पर्यावरणीय व्यवस्थापन या धड्यामध्ये पर्यावरणाचे संतुलन, विद्यार्थ्यांची भूमिका असणे अपेक्षित आहे. याबरोबरच जैवविविधता याविषयी सांगण्यात आले आहे.