जम्मू-काश्मीर : काल रात्री पासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे नुकत्याच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये व्यत्यय आला आहे. अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम या मार्गांवर थांबवण्यात आली आहे. काल रात्रीपासून जोरात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जवळच्या भागांमध्ये पाणी आणि दरी कोसळायची भीती निर्माण झाली यामुळे पूर्वसूचना देवून अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
काल रात्रीपासूनच अनंतनाग, बालटाल, कारगिल येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष करून बलताल आणि पहलगाम येथून अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून हे मार्ग आणि यात्रा आजच्या दिवस बंद ठेवण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर मार्गाची पुन्हा एकदा पाहणी करूनच यात्रा पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल, असे यात्रेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान कालच या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये या यात्रेकरूनचा पहिली तुकडी अमरनाथ गुहेकडे रवाना करण्यात आली होती. यंदाच्या यात्रेसाठी देशभरातून एकूण १ हजार ९०४ च्या भाविकांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये १ हजार ५५४ पुरुष, ३२० स्त्रिया आणि २० लहान मुले यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात यंदा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.