
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार आहे. याव्यतिरिक्त तुमचे पीएफ खातेही सुरूच राहणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर बोलताना केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, “या योजनेंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकणार आहे. तसेच त्याचे खातेही सुरू राहणार आहे.”
“कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या तरतुदीतील सुधारणेनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएफओ सदस्य स्वतःच्या खात्यातील उर्वरित २५ टक्के रक्कम काढून खातेही बंद करू शकतो. ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये ईपीएफओची गुंतवणूक ४७ हजार ४३१ .२४ कोटी रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. लवकरच हा आकडा एक लाख कोटींच्या घरात जाईल. या गुंतवणुकीवर १६ .०७ टक्के परतावा मिळत आहे,” अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.