‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ हा ठाणे व मुंबईतील काही डॉक्टर्सचा गट. हे डॉक्टर्स काय करतात? तर दरवर्षी काही दिवस देशाच्या पूर्वोत्तर टोकाला, नागालँडमध्ये जातात, तिथे आरोग्य शिबीर घेतात, आणि तेथील दुर्गम, ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत औषधोपचार करतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष भावनेनं ही मंडळी गेली काही वर्षं कार्यरत आहेत.
‘देशासाठी काहीतरी केलं पाहिजे’ हे वाक्य आपल्याला गल्लीगल्लीत, नाक्यानाक्यावर ऐकायला मिळतं. तशी एक ‘फॅशन’च झाली आहे. सकाळी उठून चहा आणि वृत्तपत्र हाती घेऊन, गप्पा मारताना इतरांना देशासाठी काहीतरी करण्याचे डोस अनेक जण पाजतात. मात्र, तसं खरोखरच प्रत्यक्षात करणारे मोजकेच आढळतात. देशाची सेवा करणं म्हणजे केवळ सैन्यात भरती होऊन, सीमेवर लढायला जाणं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं, तर प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात, आपापल्या क्षमतेनुसार, उपलब्ध वेळेनुसार आपापल्या परीने योगदान देणं, हीदेखील देशाची सेवाच असते. ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ हा उपक्रम पाहिल्यावर याचीच साक्ष मिळते. ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ हा ठाणे व मुंबईतील काही डॉक्टर्सचा गट. हे डॉक्टर्स काय करतात? तर दरवर्षी काही दिवस देशाच्या पूर्वोत्तर टोकाला, नागालँडमध्ये जातात, तिथे आरोग्य शिबीर घेतात, आणि तेथील दुर्गम, ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत औषधोपचार करतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष भावनेनं ही मंडळी गेली काही वर्षं कार्यरत आहेत.
‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ या उपक्रमाची सुरुवात मार्च, २०१५ मध्ये झाली. ऑक्टोबर, २०१४ मध्ये नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्याशी झालेल्या एका छोट्याशा वार्तालापातून या उपक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सुपर्णा निरगुडकर या डॉक्टर आहेत, असे आचार्य यांना समजताच ते तात्काळ म्हणाले की, आपण नागालँडमध्ये एखादं आरोग्य शिबीर का घेत नाही. “नागालँड म्हटल्यावर प्रारंभी आमच्या डोळ्यासमोर तेथील अशांतता, उग्रवादी गट असं सारं उभं राहिलं. त्या भीतीमुळे तिथे जावं की न जावं याबाबत आम्ही साशंक होतो, पण नंतर मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला,” असे डॉ. निरगुडकर सांगतात. स्वतः पद्मनाभ आचार्य यांनी या डॉक्टर्सच्या सुरक्षिततेची हमी दिली, तसेच ‘तुम्ही त्याबाबत काही चिंता करू नका, तुम्ही फक्त या आणि काम करा’, अशा शब्दांत आश्वस्त केले. त्यानंतर डॉ. सुपर्णा निरगुडकर यांनी त्यांच्या वर्तुळातील काही इतर डॉक्टर्सनाही या कामासाठी राजी केले. प्रथमतः नागालँडला भेट द्यावी, तेथे आरोग्य क्षेत्राची काय परिस्थिती आहे, हे प्रथम जाणून घ्यावं असं ठरलं. त्यानुसार ठाण्यातील सहा विविध ‘स्पेशालिटी’चे डॉक्टर नागालँडला रवाना झाले. या सगळ्यात बरेचजण आधी येण्यास राजी झाले पण नंतर या ना त्या कारणाने आलेच नाहीत, अशाही घटना घडल्या. अखेर, डॉ. सुपर्णा निरगुडकर यांच्यासह एकूण सहा डॉक्टर्सनी मिळून मार्च, २०१५ मध्ये नागालँडची राजधानी कोहिमामध्ये पहिले आरोग्य शिबीर घेतले. मुंबईतून कोहिमाला थेट विमानसेवा नसल्याने आणि मुळात कोहिमात विमानतळच नसल्याने मुंबई ते कोलकाता, कोलकाता ते आसाममधील दिब्रुगढ, दिब्रुगढ ते नागालँडमधील दिमापुर असा तीन टप्प्यांतील विमानप्रवास आणि दिमापूर ते कोहिमा रस्त्याने प्रवास करून, हे सर्वजण कोहिमात पोहोचले. या सहाजणांनी दररोज सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या वेळात सरासरी शंभरेक रुग्णांची तपासणी केली. कोहिमा राज्याची राजधानी असल्याने तेथील रुग्णालय सर्व सोयीसुविधांनी बर्यापैकी सुसज्ज होते. जे विकार, व्याधी मुंबई-ठाण्यासारख्या शहरातील लोकांमध्ये आढळतात उदाहरणार्थ मधुमेह, हृदयविकार आदी विकार नागालँडसारख्या निसर्गाच्या भरभरून दिलेल्या, प्रदूषणमुक्त असलेल्या प्रदेशातही आहेत, असं या तपासणीदरम्यान लक्षात आलं. मुंबईतून काही तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम खास आपल्या आरोग्य तपासणीसाठी एवढ्या लांब येत आहे, हे समजताच तेथील नागरिकांनी शिबिरामध्ये पहाटे पाचपासूनच हजेरी लावली होती. कित्येक लोक दूरदूरहून चालत आले. दुसरी एक अशी गोष्ट तेथे आढळली, ती म्हणजे जसे मोठ्या शहरांत शासकीय रुग्णालयांत औषधोपचार मोफत उपलब्ध होतो, तशी तेथे काहीच व्यवस्था नाही. हे सहा डॉक्टर्स जी औषधे लिहून देत, ती तेथील नागरिकांना बाहेर मेडिकलमध्ये जाऊन विकत आणावी लागत. त्यामुळे केवळ आरोग्य शिबीर घेऊन चालणार नाही, तर रुग्णांना औषधांचीही सोय करून द्यावी लागेल, हे या मंडळींच्या लक्षात आलं. चार दिवसांचे पहिले शिबीर आटोपून, ही टीम महाराष्ट्रात परतली. त्यानंतर पुढील शिबिरात औषधांचे काय करायचे, यासाठी त्यांनी मुंबईत एक बैठकच घेतली व त्यावर विचारमंथन केलं. या चार दिवसांच्या शिबिरात केलेल्या अभ्यासानुसार नागालँडच्या जनतेच्या आरोग्याबाबतची परिस्थिती, उपलब्ध आरोग्य सुविधा व त्यांतील कमतरता आदींबाबत सविस्तर अहवाल त्यांनी नागालँडच्या राज्यपालांना पाठवला. पहिल्या शिबिराच्या यशानंतर या उपक्रमात आणखी काही डॉक्टर्स स्वतःहून सामील झाले.
एप्रिल, २०१६ मध्ये म्हणजे बरोबर एका वर्षानंतर ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ने दुसरं आरोग्य शिबीर घेतलं, आणि विशेष म्हणजे डॉक्टर्सची संख्या यावेळेस सहावरून नऊवर गेली होती. यावेळेस त्यांनी सुमारे लाख-दीड लाख रुपये किंमतीची औषधेही सोबत नेली. प्रत्येक डॉक्टरने आपल्या औषधविक्रेत्याकडून शक्य तितकी औषधं सोबत घेतली. याचसोबत पेनकिलर्स, व्हिटामिनच्या गोळ्या अशी सर्वसाधारण औषधंही त्यांनी नेली. हे दुसरं शिबीरदेखील कोहिमामध्येच घेण्यात आलं. नागालँडमध्ये सुमारे सतरा ते अठरा जनजाती आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. त्यामुळे संपर्काची मोठी अडचण या डॉक्टर्सना जाणवली. त्यामुळे एक दुभाषी सतत सोबत ठेवावा लागे. ‘यावेळेस आम्ही औषधंदेखील सोबत नेली, याचं आम्हाला समाधान वाटत होतं. शिबीर संपल्यावर उरलेली औषधंही आम्ही तिथे ठेऊन आलो’, असं सुपर्णा निरगुडकर सांगतात. औषध कंपन्या थेट नागालँडमध्ये औषधं पाठवण्यास राजी होत नाहीत, अशीही माहिती त्यांनी दिली. ते गुवाहाटीपर्यंत जातात पण त्यापुढे औषध कंपन्या पोहोचत नाहीत. त्यामुळे नागालँडसारख्या राज्यांना औषधपुरवठ्यासाठी सर्वस्वी आसामवर अवलंबून राहावं लागतं. पहिल्या दोन शिबिरानंतर या मंडळींना हळूहळू नागालँडचं ‘आरोग्य’ समजू लागलं होतं, आणि त्यानुसार आता इथे काय केलं पाहिजे, याबाबत त्यांच्या कल्पना आकार घेऊ लागल्या होत्या. कोहिमा हे राज्यातील मोठं शहर असल्याने तिथे आरोग्यसुविधा बर्यापैकी चांगल्या अवस्थेत उपलब्ध होतात. परंतु, राज्यात इतर भागात विशेषतः, डोंगराळ दुर्गम भागात काय परिस्थिती आहे हे जाणून, घेण्यासाठी या सर्वांनी पुढील शिबीर कोहीमाबाहेर घेण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबर, २०१६ मध्ये तिसरं शिबीर एकाच ठिकाणी घेण्याऐवजी राज्यातील सात जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलं. कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रोटरी क्लब आदी संस्थांनीही यावेळी मदत केली. त्यामुळे यावेळी चक्क पन्नास डॉक्टर्स नागा जनतेच्या आरोग्यसेवेसाठी दाखल झाले होते. यावेळी सर्व शिबिरं ग्रामीण, दुर्गम भागात झाली. राज्यात अशांतता असली, तरी या शिबिरांना मात्र जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच, डॉक्टर्सना आवश्यक असणारे इतर कर्मचारीही राज्यातूनच उपलब्ध झाले. मोकोकचुंग, वोखा अशा राज्याच्या अत्यंत दुर्गम समजल्या जाणार्या भागांत स्वतः डॉ. सुपर्णा निरगुडकर गेल्या होत्या. या डोंगराळ भागातील जनतेत हायपर ऍसिडीटीची समस्या फारच गंभीर असल्याचं आढळून आलं. या प्रदेशात जेवण अत्यंत तिखट असतं, आणि याला कारण म्हणजे येथे पिकणार्या मिरच्या अत्यंत झणझणीत, डोळ्यांतून पाणी आणणार्या असतात. याशिवाय स्थानिक जेवणात शाकाहारी पदार्थ अतिशय नगण्य असून, मांसाहाराचंच वर्चस्व आहे. स्वतः शाकाहारी असलेल्या डॉ. निरगुडकरांना नागा जनतेच्या या मांसाहारप्रेमाचा चांगलाच अनुभव आला. ही डॉक्टर मंडळी कोहिमात बाजारहाटासाठी बाहेर पडली आणि तेथील बाजारात त्यांना भाज्या कमी आणि जनावरंच जास्त असं चित्र त्यांना पाहायला मिळालं. साप, बेडूक, झुरळं असे सर्वप्रकारचे प्राणी तिथे विक्रीसाठी ठेवलेले आढळले. तुम्ही नाव घ्याल, तो तो प्राणी तिथे पाहायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. हा आमच्यासाठी एक ‘कल्चरल शॉक’च होता, असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात घेतलेल्या या शिबिरालाही नागा जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुढील शिबीर झालं ते एप्रिल, २०१८ मध्ये. यावेळेस मोकोकचुंग, वोखापेक्षाही अतिदुर्गम मानल्या जाणार्या, म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या ‘मोन’ जिल्ह्यात ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ पोहोचले. तुमची सर्वांत जास्त गरज तिथे आहे, कारण तिथे काहीच पोहोचत नाही! अशा शब्दांत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या डॉक्टर्सना मोनमधील परिस्थिती सांगितली होती आणि त्यानुसार ही मंडळी तिथे पोहोचली. जिल्ह्यात एकमेव जिल्हा रुग्णालय आहेत, आणि तिथे केवळ एकच डॉक्टर आहे, हे धक्कादायक चित्र तिथे दिसून आलं. आता अख्ख्या जिल्ह्यात एक डॉक्टर आणि तोच सर्जन, तोच फिशियन, तोच सारं काही, अशी स्थिती होती. ठाण्यातून गेलेल्या डॉक्टर्सना मोनमध्ये पोहोचण्यासाठीच भरपूर द्राविडी प्राणायाम करावं लागलं. मुंबईतून दिल्ली, दिल्लीतून गुवाहाटी, गुवाहाटीतून जोरहाट अशा तीन टप्प्यांत विमानप्रवास आणि जोरहाटहून सात-आठ तासांचा रस्त्याने प्रवास करत ही मंडळी मोनला पोहोचली.
‘आसाम संपेपर्यंत आमचा प्रवास शांततेत, मजेत सुरू होता. आसाम संपलं आणि लगेचच भलामोठा घाटरस्ता सुरु झाला. तो रस्ताही कच्चाच. तिथे दिवस लवकर मावळत असल्याने पूर्णपणे अंधार, आसपास कुठेही वस्ती नाही त्यामुळे रस्त्यांवर दिवे वगैरे काहीच नाही. कितीतरी वेळ रस्त्यावर दुसरं वाहनही नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडं धास्तावायला झालं’ अशा शब्दांत डॉ. निरगुडकरांनी त्या प्रवासाचं वर्णन केलं. जोरहाट विमानतळापासून पुढील प्रवासात नागालँड सरकारतर्फे एक दुभाषी सोबत देण्यात आला होता. या मंडळींसाठी तोच माहितगार, तोच वाटाड्या आणि तोच त्या प्रवासाचा सर्वेसर्वा होता. मजल-दरमजल करत हे सारे लोक मोनमध्ये पोहोचले. तेथील जिल्हाधिकार्यांनी त्यांचं स्वागत केलं. स्वागत करतानाच जिल्हाधिकार्यांनी त्यांना बजावलं होतं, की सकाळी, दुपारी तुम्ही शिबीर घ्या, मात्र दुपारी (तेथील सायंकाळ) चार वाजल्यानंतर या इमारतीच्या बाहेर पडायचं नाही. कारण, बाहेर तुमच्या सुरक्षिततेला धोका असू शकतो! आता सायंकाळी चारनंतर बाहेर पडायचं नाही, तर कधी पडायचं? असाच प्रश्न या सर्व डॉक्टरांना पडला, पण जिल्हाधिकार्यांनी निक्षून सांगितलं की, इथे पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांच्या हातातही बंदुका दिसतात. त्यात ना त्यांना तुमची भाषा येत आणि तुमची त्यांना येत. त्यामुळे जर रस्त्यात कुठे त्यांनी तुम्हाला पकडलं, तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकणार नाही आणि त्यांचा काही गैरसमज झाल्यास ते तुम्हाला ठारही मारू शकतात! या अशा सगळ्या परिस्थितीत मोनमधील शिबीर सुरू झालं. मात्र, याचं प्रतिबिंब शिबिरात मात्र कुठेच पाहायला मिळालं नाही. जसे हे डॉक्टर्स मुंबई-ठाण्यात रुग्णांना तपासतात, तसेच ते तिथेही तपासत होते. शिवाय तेथील लोकही भलतेच प्रामाणिक असल्याचं त्यांना जाणवलं. कित्येक लोकांनी ‘हो, आम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन झालो आहोत’ असं मोकळेपणाने सांगितलं. मोनमध्ये याचं प्रमाण जरा अधिकच होतं कारण जिल्ह्याला लागूनच असलेल्या म्यानमारमधून इथे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची अवैध वाहतूक होते. या शिबिरात असे कितीतरी रुग्ण आले होते जे अंमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी गेले होते, आणि त्यांची अवस्था पाहताही येत नव्हती. ‘मोनमधील शिबीर हे या आमच्या संपूर्ण उपक्रमातील सर्वांत संस्मरणीय शिबीर होतं. जिथे काहीच मिळत नाही, तिथे आम्ही आरोग्य शिबीर घेतलं, शिवाय तिथे न मिळणारी औषधंही पुरवू शकलो, याचं आम्हाला समाधान वाटतं.’ अशा शब्दांत निरगुडकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मोनच्या शिबिरात चार दिवसांत ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ने तब्बल १,२०० रुग्णांवर उपचार केले. मोनसोबत लाँगलेंग या अशाच सीमावर्ती भागातील दुर्गम जिल्ह्यातही यावेळी शिबीर घेण्यात आलं. मात्र तेथील जिल्हा रुग्णालयात सर्जरीची सुविधाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे केवळ एक फिजिशियन आणि एक डेंटिस्ट पाठवावा लागला. मात्र, त्या डेंटिस्टच्या निरीक्षणातून तिथली आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे तेथील जनतेत असलेले तोंडाचे विविध गंभीर विकार. तंबाखू सेवनाचं प्रमाण बरंच असल्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचंही प्रमाण पुष्कळ आहे. लाँगलेंगच्या शिबिरात तपासणी झालेल्यांपैकी ४० ते ५० टक्के व्यक्ती तोंडाच्या कर्करोगाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या, हेही या डेंटिस्टने सांगितलं. मोन, लोंगलेंगमध्ये फ्रेंड्स ऑफ नागालँडकडून तब्बल ४० इंडोस्कोपी, १५ मोठ्या शस्त्रक्रिया, ७ -८ लहानसहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
दरवेळप्रमाणे नवा अनुभव गाठीशी बांधून, नव्या समस्या अनुभवून, त्यांना पुढील शिबिरात पर्याय शोधण्याचा निर्धार करत, ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ची टीम महाराष्ट्रात परतली. २०१५ पासून सातत्याने ही सर्व टीम नागालँडला जात राहिली, तेथील आरोग्यसुविधांबाबत अभ्यास करत राहिली, नागा बांधवांना मोफत उपचार देण्याचं काम तर त्यांनी केलंच, शिवाय मोफत औषधंही देऊ केली. नागालँडमध्ये स्थानिक प्रवास व निवासाचा खर्च जरी त्यांना सरकारकडून मिळाला असला तरीही तिथे पोहोचण्यासाठीच्या प्रवासाचा खर्च, औषधं व इतर साहित्याचा खर्च हे सर्व या मंडळींनी स्वतःच्या खिशातून केलं. साध्या गप्पांमधून सुरू झालेला विषय पुढे हा अशा प्रकारे एका अतिशय कौतुकास्पद उपक्रमात रूपांतरित झाला. ‘‘या सर्व काळात नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि तेच आमचे प्रेरणास्थान होते.” असं डॉ. निरगुडकर यांनी सांगितलं. ‘‘ते एक ८५ वर्षांहून अधिक वय असलेले एक तरूण आहेत! त्यांनीच ‘इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर’ या नागालँडमधील लोकांकरिता काम करणार्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी ईशान्य भारतात खूप मोठं काम केलं आहे. त्यांची ईशान्य भारताप्रती असलेली तळमळ पाहून, आम्हाला मोठी प्रेरणा मिळाली. खरंतर आम्ही काहीच करत नाही. जर आम्ही इतरांमध्ये ही भावना जागृत करू शकलो, तर आम्ही यशस्वी होतो आहोत असं म्हणता येईल. आम्ही प्रारंभी सहाजण होतो, आता दरवर्षी आमची टीम वाढतेच आहे.’’ असं डॉ. सुपर्णा निरगुडकर प्रांजळपणे सांगतात. तसेच, औषधं व इतर उपकरणं सुरक्षितपणे नागालँडमध्ये नेणं, त्यासाठी आवश्यक परवानग्या यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा उपक्रम दिवसेंदिवस अधिक नेटाने, उत्साहात पुढे जातो आहे. नवनवीन लोक स्वतःहून यात सामील होत आहेत. जसं ईशान्य भारतात रस्ते-वीज-पाणी, रेल्वे-विमान वाहतूक आदी पायाभूत सुविधा, उद्योग आदी क्षेत्रांत काम होण्याची गरज आहे, आणि ते होतानाही दिसत आहे, त्याचप्रमाणे तेथील जनतेच्या वेदना समजून घेत, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम होणं गरजेचं आहे. त्याच दृष्टीने हे एक छोटसं पाऊल ‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’च्या रूपाने पडलं आहे, आणि हे व असे अनेक उपक्रम उभं राहणं, ‘राष्ट्रीय आरोग्या’च्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका निभावणारं ठरेल, यातही काही शंका नाही.