राहुल गांधींचं कसं होणार?
आपल्या देशात संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपल्या राजकीय लोकशाहीत विरोधी पक्षावर टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण अधिकार म्हटले की, जबाबदारी आणि कर्तव्यही येते हे आपण सर्रास विसरतो. राहुल गांधी यांनी थेट गांधीहत्येत संघाचा हात असल्याचा जावईशोध लावला आणि परिणामी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. गांधीहत्येत ना संघाचा संबंध होता ना सावरकरांचा. तरी काही पक्षांचा विशेषतः काँग्रेसचा संघावर आणि सावरकरांवर विशेष राग. एक राजकीय विरोध म्हणून तो ग्राह्यही धरला जाऊ शकतो. मतभेद हे साहजिक असतात. ते असलेच पाहिजे. वाद हे निकोप समाजाचे लक्षण आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांचे प्रतिपादन आहे. इथे दोन व्यक्तींच्या विचारांचा उल्लेख करणे संयुक्तिक ठरेल. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीने अॅन्टी असू नये, व्यक्तीने अॅान्टी कास्टिस्ट असावे.
दुसरे व्यक्ती म्हणजे गोळवलकर गुरुजी. गुरुजी ‘विचारधन’ या आपल्या पुस्तकात म्हणतात की, ‘विद्वेषाच्या अधारावर समाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अधोगती आणि सर्वनाश यांना निमंत्रण देणे.” आज राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष नसून अध्यक्ष झाले आहेत. देशातल्या सगळ्यात जुन्या आणि कोणे एकेकाळी संपूर्ण भारतावर राज्य असलेल्या पक्षाचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने समुदाय आपलं मत बनवतं. पण आपल्या व्यक्तित्वाचे भान नसलेले राहुल गांधी असे काहीबाही बरळत असतात. कोकाकोलाचा निर्माता पूर्वी सरबत विकत असे, मॅकडॉनल्डचा निर्माता पूर्वी ढाबा चालवत असे. ही वाक्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची आहेत. इंग्रजीत एक सुभाषित आहे. The great ignorance come with great confidence. भिवंडी न्यायालयात सध्या त्यांचा आरोप सिद्ध झाला आहे. पुढे माफी वगैरे मागून ते सुटतीलही पण प्रश्न वृत्तीचा आहे. एखाद्या संघटनेविषयी अढी मनात ठेवून पुढे जाता येत नाही. मोहनजी भागवत यांनी सर्व लोकांना आवाहन केले आहे की, ‘या, संघाचे काम याची देहि याची डोळा पाहा आणि मग ठरवा.’ हे आवाहन राहुल गांधींनी स्वीकारावे आणि आपले मत बनवावे; अन्यथा अशी वक्तव्ये होत राहतील आणि न्यायालयात खटले चालूच राहतील.