भामट्यांची भीती कायम, जनतेची सुरक्षा वार्यावर
जळगाव :
रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरटे, भामट्यांच्या वाढत्या दहशतीने डोकेवर काढल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्याचा बाहेरगावाहून येणार्या प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे जनतेला आपला जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे.
गेल्या पंधरवड्यात स्थानकावर तलवार हातात घेऊन दहशत माजविली. रेल्वे स्थानकाची सुरक्षा ‘रामभरोसे’ येऊन धोक्यात आली आहे. रेल्वे तसेच शहर पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या शनिवारी अमोल गुजर या युवकासोबत घडलेल्या घटनेवेळी अनेक नागरिक, विक्रेते तेथे उपस्थित असूनही त्यांना कोणीही मदतीसाठी पुढे धजावले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरात भामट्यांची दहशत कायम असल्याचे पुन्हा एकवेळा सिध्द झाले आहे.
अशा भामट्यांच्या दहशतीचे रेल्वे स्थानकाचा परिसर केंद्रबिंदू बनू लागले आहे. अशा घटनांवरुन जनतेची सुरक्षा वार्यावर गेल्याचे सद्यस्थितीला पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातून अनेकवेळा प्रवासी रात्री-अपरात्री प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर येतात. त्यातच महिला, युवती यांना काही टारगट, टपोरी युवकांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
हातगाड्यांचा व्याप वाढला
रेल्वेस्थानक परिसरात दररोज रात्री गुंड, चोरटे, मद्यपींचा वावर, प्रवासी महिला, तरुणींची छेडछाड नित्याचेच प्रकार घडू लागल्याने जनतेत भीती निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉटेल, दुकाने बंद झाल्यानंतर मद्याच्या नशेत तरुण मध्यरात्रीनंतर रेल्वेस्थानक परिसरात गर्दी करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चहूबाजूंनी दुचाकी उभ्या करून मद्यपी सिगारेट ओढत असतात. यातून प्रवाशांसोबत अश्लिल भाषेत बोलणे, धक्काबुक्की आदी प्रकार घडत आहेत. शहरातील रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या हातगाड्यांचा व्याप वाढला आहे. हातगाड्यांवरील व्यावसायामुळे त्याठिकाणी गर्दी होते. त्यामुळे अनेकवेळा या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
टिंगलखोरीचा प्रकार नित्याचा
रेल्वेस्थानकालगत शहर पोलीस ठाणे व लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. हद्द ओळखण्यासाठी लोखंडी पाइप बसविले आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीसाठी आल्यावर विक्रेते, भामटे रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करतात. लोहमार्ग पोलीस आल्यानंतर शहराच्या हद्दीत येतात. रात्रभर चोर-पोलिसांचा खेळ असाच सुरू असतो. दरम्यान, रात्री रेल्वेगाड्यांमधून येणार्या जाणार्या प्रवाशांना मात्र या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. प्रवाशांमध्ये महिला, तरुणींची छेड काढणे, ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक न ठेवण्यासारख्या टिंगलखोरीचा प्रकार नित्याचा झाला आहेे. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील रिक्षाचालक, हॉटेल चालक त्यांना काहीच बोलत नसल्याने त्याचा ते फायदा उचलू लागले आहेत.
वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोर्या, शस्त्र बाळगणे अशा घटनांना पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यात वाढत जाणारी ही दहशत वेळीच न रोखल्यास सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल होईल, अशी आता भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात रात्री कायमस्वरुपी पोलिसांची नियुक्ती करण्याची अपेक्षा प्रवासी जनतेने व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष घालून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवणार नाही, त्यावरही भर देण्याच्या प्रयत्नांची गरज आहे.