प.बंगाल निवडणुकांवर पुन्हा एकदा संकट ?

    10-May-2018
Total Views |

सर्वोच्च न्यायालयाकडून कोलकत्ता न्यायालयाच्या आदेशावर रोक



नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून निवडणुकीसाठी कोलकत्ता उच्च न्यायालयाने ई-मेलद्वारे अर्ज भरण्यासंबंधी दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने रोक लावलेली आहे. तसेच राज्यात येत्या १४ तारखेलाच निवडणुका घेण्यासंबंधी न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या सुरक्षेविषयी सर्वांकडूनच चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यातील ९ तारखेला राज्यामध्ये सार्वत्रिक पंचायत निवडणुका घेण्यात येणार होत्या. परंतु राज्यातील तृणमूल कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांवर हल्ला करत असून त्यांना उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप राज्यातील भारतीय जनता पक्षाने केला होता. यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, आपले गाऱ्हाणे मांडले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोलकत्ता उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या निवडणुकांना तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती.


यानंतर कोलकत्ता उच्च न्यायालयाने यावर उपाय म्हणून ई-मेल तसेच व्हॉट्सअॅपद्वारे अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते, तसेच आयोगाला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार गेल्या २६ एप्रिलला आयोगाने राज्यात १४ तारखेला मतदान घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले, तसेच गरज पडल्यास १६ तारखेला राज्यात पुन्हा एकदा फेरमतदान घेण्याची देखील तयारी दर्शवली होती. परंतु आता निवडणुकांच्या अवघ्या ४ दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने हे नवे आदेश जारी केल्यामुळे राज्यातील निवडणुका शांतते पार पडणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.