पंतप्रधानांच्या चामराजनगरमधील सभेला प्रचंड प्रतिसाद
चामराजनगर: “दिल्लीत मी बातम्या पाहतो की, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची हवा आहे. पण कर्नाटकात आल्यावर लक्षात आले की, इथे भाजपची हवा नाही. इथे भाजपचे वादळ आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील संथेमरहळ्ळी गावात आजही भाजपच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येथील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला आपल्या ताब्यात उरलेले शेवटचे मोठे राज्य टिकवायचे आहे तर दक्षिण भारतात ‘शतप्रतिशत’ भाजप आणण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. दि. १२ मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात प्रचारासाठी उतरण्याचे ठरवले असून या आठवड्यात ते राज्यातील विविध ठिकाणी मिळून एकूण ९ सभा घेणार आहेत. या आठवड्यातील प्रचाराचा नारळ नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कर्नाटकातील दक्षिण टोकावर असलेल्या चामराजनगर जिल्ह्यात फोडला. शेजारील तामिळनाडू राज्यापासून अवघ्या वीसेक किलोमीटर अंतरावर असलेल्या संथेमरहळ्ळी या छोट्याशा गावात भाजपने घेतलेल्या या विराट सभेला पंतप्रधान मोदींसह कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व विद्यमान प्रदेशाध्यक्ष खा. बी. एस. येडीयुरप्पा तसेच भाजपचे स्थानिक उमेदवार व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकाचे भाग्य बदलण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. तसेच, काँग्रेसशासित राज्य सरकार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर सडकून टीकाही केली. मोदी यांच्या भाषणादरम्यान दुभाषी त्यांचे भाषण कन्नड भाषेतून सांगत होता. मोदी यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याला टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात दाद मिळाली तसेच सभेचे मैदान ‘मोदी-मोदी’च्या गजराने दुमदुमून गेले.
आता लक्ष्य प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे !
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी कामगार दिनानिमित्त देशातील कामगार-मजुरांना वंदन केले. ते म्हणाले की, “दि. २८ एप्रिल हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, कारण देशातील कामगारांच्या कष्टामुळे देशाच्या कानाकोपर्यातील प्रत्येक गावात आज वीज पोहोचली आहे. तसेच, आता या गावागावातील प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. देशात आजही अशी ४ कोटी घरे असून सौभाग्य योजनेतून या ४ कोटी घरांना मोफत वीजजोडणी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. राहुल गांधी यांना उद्देशून ते म्हणाले की, देशातील मजूर-कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राहुल दोन शब्द चांगले बोलले असते तर बरे झाले असते. मात्र, राहुल हे तर ‘नामदार’ आहेत, ते ‘कामगारां’विषयी काय बोलणार,” अशी टीका मोदी यांनी केली.
सिद्धरामय्यांचा ‘२+१’ चा फॉर्म्युला..
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बागलकोट जिल्ह्यातील बदामी व म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी अशा दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचे पुत्र डॉ. यतींद्र हे वरूणा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा हा ‘२+१’ चा फॉर्म्युला असून हे काँग्रेसच्या घराणेशाहीचेच एक रूप असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. सिद्धरामय्या हे आता निवडून येण्यासाठी मतदारसंघ शोधत इकडून तिकडून पळत असून जिथून आधी जनतेने निवडून दिले होते, तिथे आता आपल्या मुलाला बळी देण्यासाठी उतरवले असल्याचे मोदी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हा ‘२+१’ फॉर्म्युला तर मंत्र्यांसाठी ‘१+१’ चा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या याच घराणेशाहीने येथील लोकशाहीला बरबाद केले. काँग्रेसचे १० टक्के कमिशनवाले सरकार लोकशाहीच्या मिशनवर बळकट ठरत असल्याची टीका करत ‘स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कर्नाटका’साठी सत्तापालट करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, ‘आप मेरा साथ दिजीए, दिल्ली आपका साथ देगा’ अशा शब्दांत आपल्या भाषणाच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांनी कानडी जनतेला साद घातली.
राहुलजी, १५ मिनिटे बोलाच !
“मी बोलू लागलो तर मोदी संसदेत १५ मिनिटेही बसू शकणार नाहीत,” अशा खा. राहुल गांधी यांनी मोदींना दिलेल्या आव्हानावर सडकून टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, “राहुल गांधी १५ मिनिटे बोलणार हेही एक विशेषच. आम्ही पडलो कामगार, आम्ही तुम्हा ‘नामदारां’पुढे कसे काय बसणार?, आमची तुमच्यासमोर बसण्याची काय योग्यता?,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. तसेच, राहुल यांच्या या अशा बोलण्याचे आपल्याला दुःख नसून आम्ही पिढ्यानपिढ्या हे झेलले असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “राहुलजी, तुम्ही कर्नाटकात या. तुम्हाला आवडेल त्या भाषेत, कोणत्याही कागदाशिवाय, सलग १५ मिनिटे काँग्रेसशासित कर्नाटक राज्य सरकारबद्दल बोलून दाखवाच. तसेच, त्या १५ मिनिटांत ‘विश्वेश्वरैया’ हे नाव घेऊन दाखवाच. तरच कर्नाटकातील जनतेला वाटेल की, राहुल यांच्या बोलण्यात दम आहे,” अशा शब्दांत मोदी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.