टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यात येते की नाही? याची केली चौकशी
जळगाव :
एप्रिल महिन्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असुन जिल्ह्यात ७४ गावांमध्ये ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणी देण्यात येते आहे की नाही, विहिरी अधिग्रहीत व अन्य तात्पुरत्या योजना करण्यात आल्या आहे किंवा नाही याची खरी स्थिती जाणून घेण्यासाठी आज जिल्ह्यात मंत्रालयाच्या पाणीपुरवठा विभागाच्या चार अधिकार्यांची समिती दाखल झाली होती. समितीने जामनेर गावात तीन तर अमळनेर तालुक्यात दोन गावांना समितीने भेटी दिल्या.
जिल्ह्यात ७४ गावांमध्ये सध्या भीषण टंचाई आहे. या गावात पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे.तसेच पाण्यासाठी १३० गावांमध्ये १२८ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. आज पाणीपुरवठा मंत्रालयाचे चार सदस्यीय पथकाने रखरखत्या उन्हात पाच गावांना भेटी दिल्या. जामनेर तालुक्यातील एकुलती बु,लाखोली, किनगाव व अमळनेर तालुक्यातील सुंदरपटट्टी व हातले या दोन गावांना उपसचिव महेश सावंत,अवर सचिव का.जा.धलपे,कक्षअधिकारी राजेंद्र कुमटगी,राम साबणे या पथकाने भेटी दिल्या.
पथकाने गावात येणारे पाण्याचे टँकर व पाण्याचे स्त्रोत यातील अंतर,जीपीएस प्रणाली ज़ोडण्यात आली आहे की नाही यासह अधिग्रहीत व विंधन विहीरीची पाहणी केली. काही गावात पाण्याच्या स्त्रोताबाबत व टंचाई बाबत नागरीकांशी चर्चा केली. दरम्यान या पहाणी दौर्यात जि.पचे अधिकारी देखील उपस्थित होते.