मुंबई : 'मुलांची फेरपरीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय हा पूर्णपणे मूर्खपणाचा असून पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेला पाठवूच नये' असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. सरकारने घेतलेल्या सीबीएसईच्या फेरपरीक्षेच्या निर्णयावर आज ते बोलत होते.
सीबीएसईचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून ठाकरे यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले. सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत या घटनेवरून सरकारचे अपयश पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे, असे त्यांनी म्हटले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेपर फुटला पण सरकार आपली चुकी मान्य करण्याऐवजी मुलांनाच पुन्हा एकदा परीक्षा देण्यास भाग पाडत आहे. यावरूनच या सरकारची हुकुमशाही कार्यपद्धत कळून येते. त्यामुळे आता पालकांनीच यावर ठाम भूमिका घेत आपल्या मुलांना परीक्षेला पाठवूच नये' असा सल्ला त्यांनी दिला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईच्या पेपर फुटीनंतर पुन्हा एकदा १० वीच्या परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर सध्या देशभरात पालक आणि विद्यार्थी यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. सरकार आणि सीबीएसईच्या या निर्णयामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच राज ठाकरे यांच्या आजच्या या वक्तव्यामुळे या मुद्दाचे देखील विरोधकांकडून राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.