सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांची भेट घेऊन भारिपच्या मागण्यांवर चर्चा करेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान भेटीची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच शिष्टमंडळामध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोण असणार याविषयी देखील माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. आंबेडकरांना मात्र चर्चे आमंत्रण स्विकारले असून आपण चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्याअगोदर आझाद मैदानावर एक सभा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आझाद मैदानावर उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधून आणि त्यांच्या चर्चा करूनच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, असे त्यांनी जाहीर केले आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीसाठी भारिपने हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांना अटक केली जावी, अशी मागणी गेल्या तीन महिन्यांपासून भारिपकडून केली जात आहे. यातील एकबोटे यांना अटक झाली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. परंतु भिडे गुरुजींना अटक न झाल्यामुळे भारिपकडून आज 'एल्गार मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.