धुळे -हिन्दू जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. १० आणि ११ मार्च असे २ दिवस येथील अग्रवाल विश्राम भवन येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील ७ जिल्ह्यांमधील २० हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योजक यांचे १०० प्रतिनिधी उपस्थित होते.
१० मार्च या दिवशी सनातनचे संत सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या उपस्थितीत ह.भ.प. संकेत दीक्षित गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनात दीक्षित गुरुजी म्हणाले, ‘समाजाला दिशा देण्याचे कार्य हिंदु धर्मातील संतांनी अन् धर्मगुरुंनी केले आहे. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या समाधीचा अंतिम विधी १८ घंटे ३० मिनिटे चालला; परंतु कोणत्याही प्रसारमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी दिली नाही. याउलट आयष्यभर संपत्तीच्या मागे धावणार्या सिनेअभिनेत्रीचा अंतिम विधी मात्र तासन्तास प्रसारीत करण्यात आला’
दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात लव्ह जिहाद, गोरक्षण, धर्मांतरण, सरकारी मंदिरांमध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच धर्मद्रोह्यांकडून हिंदु धर्माच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार आदी आघातांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, अधिवक्ता. सुनिल जैन, अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता नीलेश सांगोलकर,अधिवक्ता. उमेश भडगांवकर, अधिवक्ता देवेंद्र मराठे यांनी मार्गदर्शन केले, तर अधिवक्ता. निरंजन चौधरी (जळगाव) आशिष जैन(अक्कलकुवा), यश किंगराणी (जळगाव), मुकूंद महाजन (शिवपूर), चेतन चौधरी (सोनगीर), पियुष खंडेलवाल (धुळे), भूषण महाजन (भुसावळ), डॉ. योगेश पाटील (धुळे) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे लढा देऊ, असा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.