फिर सुबह होगी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018   
Total Views |

 
 
31 डिसेंबर 2018. आजचा निरोपाचा दिवस! राजकीय क्षितिजावर 2018 चा ताळेबंद मांडला जात असतानाच, 2019 चे आराखडेही मांडले जात आहेत. 2018 सरत आले असताना, बहुतेक चॅनेलवाल्यांनी, आपल्या जनमत चाचण्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील एक समान निष्कर्ष म्हणजे, भाजपाला बहुमतासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि सारेकाही उत्तरप्रदेशात होणार्या युतीवर अवलंबून आहे. यात केवळ उत्तरप्रदेशाचा विचार करून चालणार नाही, तर महाराष्ट्र आणि बिहारचाही विचार करावा लागणार आहे.
उत्तरप्रदेशात, सपा-बसपा-राष्ट्रीय लोकदल यांची युती झाली आहे. म्हणजेच यादव, जाट, दलित, मुस्लिम हे समाजघटक या युतीसोबत राहणार आहेत. कॉंग्रेसचे काय? हा अद्याप एक अनुत्तरित प्रश्न आहे. राज्यातील 80 जागांपैकी कॉंग्रेस किती जागा लढेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही सूत्रांच्या मते, कॉंग्रेस नमते घेत या युतीत सामील होईल वा वेगळे लढण्याची वेळ आलीच, तर कॉंग्रेस निवडक जागांवर आपले उमदेवार उभे करील. सपा- बसपाचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. याच कारणास्तव, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी, अद्याप आक्रमक भूमिका घेतलेली नाही. सपा-बसपा-लोकदल युती भाजपासाठी त्रासाची ठरणार आहे. कॉंग्रेससमुळे तो त्रास वाढतो की कमी होतो, हे येणार्या काही आठवड्यांत दिसणार आहे.
बिहारमधील युती
बिहारमध्ये भाजपा व कॉंग्रेस आघाड्या तयार झाल्या आहेत. भाजपा व रामविलास पास्वान यांच्यातील जागावाटप झाले आहे. एकीकडे भाजपा, जनता दल यु व रामविलास पास्वान; तर दुसरीकडे, कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, जितमराम मांझी व उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष, अशी ही लढत होणार आहे. बिहारमधील एक अनुत्तरित घटक म्हणजे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा व खा. कीर्ती आझाद यांची भूमिका. दोघेही भाजपाचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आजवर कधीही पक्षबदल केलेला नाही. त्यांच्याशी चर्चा करून विषय संपविला जाणे आवश्यक होते. अद्यापही ती वेळ गेलेली नाही. या दोन्ही नेत्यांशी बोलून, झाले गेले विसरून त्यांनी कामाला लागावे, असा प्रयत्न व्हावयास हवा. शत्रुघ्न सिन्हा भाजपासाठी त्रासदायक ठरू शकतात. सिन्हा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण कीर्ती आझाद हे काही मंत्रिपदाचे दावेदार नव्हते. त्यांचा वाद होता दिल्ली क्रिकेट असोसिएशन संदर्भात. आताही हा विषय संपविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यांचे वडील भागवत झा आझाद हे बिहारचे मुख्यमंत्री होते. काही मतदारसंघांत तेही भाजपासाठी अडचणीचे ठरू शकतात. आणखी एक मुद्दा म्हणजे, बिहारच्या जागावाटपात भाजपाला 17 जागा मिळाल्या आहेत. विद्यमान लोकसभेत, भाजपाजवळ 22 खासदार आहेत. 2014 मध्ये भाजपाने 28-29 जागा लढविल्या होत्या. स्वाभाविकच, भाजपा 11-12 जागा कमी लढविणार आहे. या मतदारसंघातील दावेदार व किमान पाच खासदार निवडणुकीत काय करतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकदा भाजपा व मित्रपक्षांचे मतदारसंघ निश्चित झाले की, मग हे खासदार आपला विचार करतील. त्यातील किती खासदार-दावेदार पक्षाचा व्यापक विचार करतील व किती आपला विचार करतात, हे स्पष्ट झाल्यावर बिहारचे चित्र खर्या अर्थाने स्पष्ट होईल.
महाराष्ट्रातील समस्या
उत्तरप्रदेशानंतरच्या सर्वात मोठ्या राज्यात- महाराष्ट्रात काय होईल, हेही स्पष्ट झालेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या आक्रमकतेने भाजपा सरकारवर हल्ला चालविला आहे, ती आक्रमकता वेगळाच संकेत देणारी आहे. वास्तविक, भाजपा व सेना हे समविचारी पक्ष. शिवसेनेसोबत लहान भाऊ-मोठा भाऊ या वादात न अडकता ‘जुळे भाऊ’ असा विचार करून हा प्रश्न सोडवायला हवा. यात चर्चेच्या फेर्या न करता निर्णय केला जाणे आवश्यक होते. शिवसेना नक्की काय करील, हे स्पष्ट झालेले नाही. मोदी सरकारविरुद्ध टोकाची भूमिका घेतल्यानंतर, सेनेने आता भाजपासोबत जागावाटप केले, तर यात सेनेचे हसे होणार आणि त्रिकोणी लढत झाल्यास शिवसेनेचे अधिक नुकसान होणार. ही स्थिती टाळली जाणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांतील एकूण 168 जागांपैकी 148 जागा भाजपा व मित्रपक्षांजवळ होत्या. फक्त 20 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. यातील किती जागा भाजपा व मित्रपक्ष कायम राखतात, यावर नव्या लोकसभेचे चित्र अवलंबून राहणार आहे.
फिर सुबह होगी!
2018 आज संपत असले, तरी सकाळ उजाडणार आहे. आजची सायंकाळ भाजपासाठी काहीशी चिंताजनक भासत असली, तरी नववर्षाची सकाळ उजाडणार आहे. कारण, राजकारण हे काही एका निवडणुकीवर थांबत नसते. तीन राज्यांतील निकाल भाजपासाठी काहीसे निराशाजनक असले, तरी तो काही पूर्णविराम नाही.
देशाच्या राजकीय क्षितिजावर दिसणारे एक समान चित्र म्हणजे, बहुतेक राजकीय पक्ष भाजपाच्या विरोधात एकजूट होत आहेत. थेट कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कोलकातापासून ते कच्छपर्यंत. विशेष म्हणजे हे सारे पक्ष कधी ना कधी भाजपासोबत होते. दक्षिणेतील द्रमुकपासून, काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, बंगालमधील ममतापासून, उत्तरप्रदेशातील मायावतीपर्यंत सर्वांनी भाजपासोबत साथसंगत केली आहे. हे सारेच प्रादेशिक पक्ष आज सत्तेसाठी वेगळे झाले आहेत. राजकारण हे निर्दयी असते, असे म्हटले जाते. ते पूर्णपणे चूक आहे. राजकारण हे साकारत असते ते मानवीय संबधांच्या समीकरणातून.
इंदिरा गांधींची शाल
श्रीमती इंदिरा गांधी या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या. पंतप्रधान असताना, मंत्रिमंडळाची की कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होती. दक्षिणेतील नेत्यांना दिल्लीतील थंडीची कल्पना नसते. ते आपली लुंगी, कुर्ता, पायजामा घालून येतात. केरळचे नेते के. करुणाकरन् त्यातील एक. इंदिरा गांधींची नजर करुणाकरन् यांच्यावर गेली. ते थंडीने कुडकुडत होते. ते पाहून इंदिरा गांधींनी आपल्या अंगावर ओढलेली शाल काढली आणि ती एका सेवकामार्फत करुणाकरन् यांच्याकडे पाठविली. करुणाकरन् अवाक् झाले. ते हा प्रसंग कधी विसरू शकतील? इंदिरा गांधी राजकीय संबधातील व्यक्तिगत संबधाचा रेशीमबंध विसरल्या नाहीत.
 
1971 च्या युद्धात पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. शरणागतीसोहळा ढाक्यात होणार होता. जनरल मानेकशा स्वत: त्या सोहळ्यास जाऊ शकत होते. त्यांचे नाव अजरामर झाले होते. स्वत: न जाता त्यांनी लेफ्ट. जनरल जगजीतिंसग अरोरा यांना त्या सोहळ्यास जाण्यास सांगितले. जनरल मानेकशा यावरच थांबले नाहीत. त्यांनी अरोरा यांना दूरध्वनी करून सांगितले, हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. एकटा जाऊ नकोस, सोबत आपल्या पत्नीलाही घेऊन जा! लेफ्ट. जनरल अरोरा आयुष्यभर मानेकशांनी दाखविलेला आदर विसरू शकले नाहीत.
रोझेस इन डिसेंबर
आज डिसेंबरचा शेवटचा दिवस. न्या. एम. सी. छागला यांचे ‘रोसेझ इन डिसेंबर’ या नावाने लिहिलेले आत्मचरित्र फार गाजले होते! न्या. छागला शेवटी लिहितात, मी माझ्यासोबत काम करणार्या कोणत्याही कर्मचार्यास कधी टाकून बोललो नाही. ते बिचारे तुमचा प्रतिवाद करण्याच्या स्थितीत नसतात. त्यामुळे ते मुकाटपणे ऐकून घेतात. आपण आयुष्यभर खूप काम करतो. अनेक उपलब्धी आपल्या नावाने जमा होतात. पण, शेवटी आठवणीत राहतात ते आपले व्यक्तिगत मानवीय व्यवहार. न्यायालयीन कर्मचार्यांप्रती न्या. छागला यांच्या मनात आस्था होती.
@@AUTHORINFO_V1@@