स्पष्ट होईलच...
या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा बाळगण्यात निश्चितच काही अर्थ नाही. कारण, या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलले आणि त्याच दिवशी प्रवक्ते खा. संजय राऊत जे बोलले, ती दोन्ही विधाने समोरासमोर ठेवली की, सारंच कसं गोलमाल आहे, हे लक्षात येतं. “युती होणार की नाही, जागावाटप किती होणार, या फालतू चर्चेत मी जात नाही. मला राम मंदिर आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जास्त महत्त्वाची आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडे संजय राऊत काय म्हणाले? “राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि शिवसेनेचं राज्य यावं,” ही आमची इच्छा आहे. जनतेला मूर्ख समजून आपलंच घोडं पुढे दामटण्यालाही काही मर्यादा असतात. शिवसेना नेतृत्वाने सध्या त्याही सोडल्याचं या वक्तव्यांतून स्पष्ट दिसतं. तुम्हाला जर सरकारचा एवढाच राग आहे, तर सत्ता सोडा. विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरा, उग्र आंदोलन करून सरकारला जेरीस आणा. कुणी अडवलं आहे काय? परंतु, सत्तेत राहायचं, मंत्रिपदं घ्यायची आणि दुसरीकडे त्याच सरकारला दूषणेही द्यायची, हा दुटप्पीपणा महाराष्ट्र गेली साडेचार वर्षे पाहत आहे. सुरुवातीला जेमतेम काही दिवस विरोधी पक्ष म्हणून काम केल्यानंतर सत्तामोह सोडवता न आल्याने चूपचाप शिवसेना सत्तेत सामील झाली. एवढी नाचक्की होऊनही पुन्हा आपल्याच सरकारच्या विरोधात दूषणे देणे मात्र सेनेने थांबवले नाहीच. या दुटप्पी धोरणाची फळे प्रत्येक निवडणुकीत मिळाली तरीही सेनेने आपलं धोरण बदललं नाही. आता तर म्हणे, आम्हाला जागावाटप आणि निवडणुकांत स्वारस्य नाही. ते नसतं तर २०१४ मध्ये युती तुटली असती का? उगाच काहीही बोलायचं? बरं, मुळात युती तुटली आहे आणि राज्यात सेनेचाच मुख्यमंत्री आणायचा आहे, तर जागावाटपात तुम्हाला स्वारस्य आहे अथवा नाही, याचा संबंधच कुठे उरतो? तीन राज्यांत भाजपचा पराभव झाल्याने तुम्हाला एवढ्या आनंदाच्या उकळ्या का फुटाव्यात? हे आणि असे शेकडो प्रश्न अनुत्तरितच राहतात. उरतं ते फक्त साहेबांचं झक्कास भाषण आणि त्यावर टाळ्यांचा कडकडाट वगैरे. आता हे सारं २०१९ च्या निवडणुकांपर्यंत चालेलच. परंतु, प्रत्यक्ष रणमैदान जवळ आल्यानंतर जागावाटपात आणि निवडणुकीत कोणाला स्वारस्य आहे, हेही स्पष्ट होईलच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/