खवय्यांची विनंती
गेल्या महिन्यात नावाजलेल्या नाश्ता सेंटरमधील वडापावमध्ये पाल आढळली वगैरे वगैरे प्रकरण तर फार गाजले. हो, हे सगळे आठवताना ठाण्याची पाणीपुरी कशी विसरून चालेल. पाणीपुरीला आगळी चव आणण्यासाठी तो पाणीपुरीवाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धरणे भरण्यासाठी जी युक्ती सांगत होते ते करत होता. (कृपया धरण आणि अजित पवार हा संदर्भ फारच अविस्मरणीय असल्यामुळे ती युक्ती इथे लिहिण्याचे टाळले आहे.) असे काही म्हटले की, खवय्ये आपल्या खवय्येगिरीचे समर्थन करताना सांगतात की, “आम्ही काय थर्डक्लास, रोडछाप हॉटेलात जेवत-खावत नाही. आम्ही लायकीच्या आणि पॉश हॉटेलमध्येच जेवतो.” वर हे खवय्ये असेही आग्रहाने सांगतात की, “अगदी अमुक एका उपाहारगृहात एकदम घरच्यासारखी चव असते.” (आता घरी बनवलेल्या जेवणासारख्या चवीचे पदार्थच जर खायचे आहे तर मग ते दामदुप्पट पैसे मोजून हॉटेलात का खायचे, घरीच बनवलेले पदार्थ का खात नाहीत? या प्रश्नाचे समाधान अजून कुणीही केलेले नाही.) या अमुक एक उपाहारगृहामध्ये जेवणे, यातही स्टेटस असते म्हणे. पण स्टेटस सिंबॉल बनलेली ही उपाहारगृहे ग्राहकांचे हित जपतात का? व्यवसायाबरोबरच मानवी मूल्ये आणि गरजा यांचा विचार करतात का? तर माफ करा, याचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल. अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध ४४२ रेस्टॉरंट-हॉटेलची तपासणी केली. त्यावेळी यातील ३२७ रेस्टॉरंट-हॉटेल्स अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात ही तपासणी करण्यात आली. तेव्हा ३ हजार ४७ रेस्टॉरंट-हॉटेलपैकी तब्बल २ हजार ६४९ रेस्टॉरंट-हॉटेलमधील किचन अस्वच्छ आहेत. तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. राज्यातील ८६.९३ टक्के रेस्टॉरंट-हॉटेल हे काहीही खाण्यासाठी योग्य नसल्याचे आढळून आले. या तपासणीनंतर एफडीएने ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. जोपर्यंत आवश्यक ते बदल केले जात नाही, तोपर्यंत मुंबईसह राज्यभरातील २ हजार ६४९ रेस्टॉरंट-हॉटेल्सचे शटर डाऊन असणार आहे. हे सगळे पाहून वाटते की, उपाहारगृहामध्ये जाऊन क्षुधाशांती करणाऱ्या पामरांनी काय करावे? कारण सगळ्या तडजोडी करता येतात पण जेवणाखाण्याची तडजोड कशी करावी? त्यामुळे या सगळ्या उपाहारगृहांच्या बाबतीत कडक उपाययोजना व्हावी, हिच खवय्यांची विनंती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/