काश्मिर खोऱ्यात सोशल मीडियावर दहशतवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018   
Total Views |


शेजारील राष्ट्र चीनने त्यांच्या देशात सोशल मीडियावर पूर्णपणे निर्बंध लादले आहेत. तसेच पाऊल भारताने उचलले पाहिजे. कोणतीही चुकीची बातमी किंवा अफवा पसरवण्यात येत असेल, तर ते त्वरित ब्लॉक केले पाहिजे. पोलीस खात्यामध्ये सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळा विभागच कार्यरत केला पाहिजे.


बदलत्या युगात समाजमाध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत पण, या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे आणि वायफळ विनोद करत राहणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. शिक्षणाबरोबर आपल्याला एखाद्या माध्यमांचावापर कशा पद्धतीने करायचा, याची जाणीव झाली पाहिजे पण, ती दृष्टी कमी असल्याचे दिसून येते. आता याबाबत गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. नेमके हेच काश्मीर खोऱ्यात होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यात मुदासीर नावाच्या अतिरेक्याचा समावेश असून तो १४ वर्षांचा आहे. गेल्या आठवड्यातच हातात ‘एके-४७’ घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात २२५ दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे.

 

सोशल मीडिया हिंसाचार भडकविण्याचे साधन

 

जी घटना सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे बदलते स्वरूप. काश्मीर खोऱ्यात सरकारने शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला आहे. बहुतांश काश्मिरी विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्त्या मिळाल्याने काश्मीर खोरे मध्यमवर्गीय, सुशिक्षित झाले आहे. शिक्षणाचा उद्देश असा की, ते देशाचे चांगले नागरिक होतील. मात्र, ही अपेक्षा फोल ठरत हे सर्व शिक्षित युवक फेसबुक किंवा सोशल मीडिया दहशतवादी बनले आहेत. त्यांनी सोशल मीडियामध्ये दहशतवादाचा/उग्रवादाचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात अनेक सोशल मीडियाचे प्रकार आहेत. त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट अशी २० वेगवेगळी माध्यमे आहेत. याचा चांगला वापरही करता येतो तसा गैरवापरही करता येतो. याचा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरवापरच होतो आहे. भारतीय सैन्य शोधमोहीम किंवा धरपकड करायला कोणत्याही गावात प्रवेश करते तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून निरोप पाठवला जातो की, सैन्य आले आहे आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना सैन्यावर दगडफेककरण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे सैन्याची शोधमोहीम सुरू होते, तेव्हा शेकडोंनी युवक गोळा होतात आणि सैन्यावर दगडफेक करायला सुरुवात करतात. एका बाजूला दहशतवाद्यांना तोंड द्यायचे आणि मागच्या बाजूने दगडफेकीलाहीतोंड द्यायचे.

 

फेक न्यूज किंवा चुकीच्या बातम्या

 

एवढेच नव्हे, तर अनेक फेक न्यूज किंवा चुकीच्या बातम्या, फोटो पाठवले जातात. सोशल मीडियावर एक बातमी आली होती ती म्हणजे, सैन्याने एका भागात असलेल्या सर्व हातगाड्या जाळून टाकल्या. त्या बातमीने हाहाकार माजला होता. मात्र, नंतर ही चुकीची बातमी असल्याचे स्पष्ट झाले. आज काश्मीर खोऱ्याची ७० टक्के लोकसंख्या ही तरुण वर्गातील आणि ३५ वर्षे वयोगटातील आहे. ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, सरकारने त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनिस्ट्रेटर्सनाडीसी ऑफिसमध्ये स्वत:ला नोंदणीकृत करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही, तर अफवा किंवा चुकीची बातमी पसरवली, तर त्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा होऊ शकते. काश्मीरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच लाखांहून जास्त आहे. त्यांनाही सोशल मीडियाचा गैरवापर करण्यापासून थांबवले जात आहे. या विरोधात तिथल्या युवक आणि कर्मचाऱ्यांनी एक चळवळ सुरू केली आहे. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वात मोठे आव्हान आहे ते प्रचंड व्याप्ती असणाऱ्या सोशल मीडियावर नियंत्रण कसे ठेवायचे. दुर्दैवाने अनेक वेळा ‘व्हॉट्सअॅप’वर येणारे मेसेज अनेक वेळा भारतातून न येता ते पाकिस्तान किंवा इतर देशांतून येतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली पाहिजे. यासाठी मोबाईल क्रमांक घेताना जशी सर्व माहिती मोबाईल कंपनीला देतो, तशीच ही माहिती सोशल मीडियाच्या वापरासाठी देणेही सक्तीचे केले पाहिजे. अनेक काश्मिरी युवक कुठलीही हिंसाचाराची घटना घडली की त्याचे ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ सुरू करतात आणि त्या घटनेला मोबाईलवरून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दहशतवादी संघटनेत नव्या तरुणांची भरती करण्यासाठी व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅपचा वापर युवकांना कट्टरतावादी बनवण्यासाठी केला जातो. आज काश्मीर खोऱ्यातील तरुण तीन प्रकारे विचार करणारे आहेत. एक म्हणजे काश्मीर खोरे स्वतंत्र हवे आहे, दुसरे ज्यांना पाकिस्तानात सामील व्हायचे आहे आणि तिसऱ्यांना कट्टरवादी इस्लामिक राष्ट्र होण्याची इच्छा आहे.

 

सोशल मीडियातून लष्कराविरुद्ध अपप्रचार

 

ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडियांतून संरक्षण मंत्रालय तसेच लष्करी मुख्यालयाच्या काही शाखांची लेटरहेड वापरून लष्कराविरुद्ध अपप्रचार सुरू आहे. भारताच्या सीमेपलीकडील देशांतून हा गैरवापर सुरू असावा असा संशय खुद्द लष्करानेच व्यक्त केला आहे. या अपप्रचाराला बळी पडून लष्करासंबंधी माहितीचा गैरवापर थांबवावा, असा इशारा लष्कराच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरून दिला आहे. सोशल मीडियावरील संदेशांमध्ये अटॅचमेंट म्हणून अशाप्रकारे लेटरहेडवर छापलेले संदेश प्रसारित झाल्याचे लक्षात आले आहे. सेवानिवृत्त सैन्याधिकारी तसेच सध्या कार्यरत असलेल्या सैन्याधिकाऱ्यांचे ब्लॉग्स किंवा त्यांच्या नावाने पेरल्या गेलेल्या व्हॉट्सअॅप संदेशांमधून खोट्या माहितीचे दस्तऐवज किंवा छायाचित्रांचा गैरवापर केला जात असल्याचे आढळले आहे. असे लेखन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही माहितीवर किंवा सामग्रीवर आधारित काही लिखाण करताना ती माहिती किंवा साहित्य यांची खातरजमा लष्करी मुख्यालयाकडून करून घ्यावी. त्याद्वारे आपल्या सैन्य दलांना अडचणीत आणण्याचे प्रयोजन आहे का, याची खातरजमा करावी.अपप्रचाराचे प्रकार सोशल मीडिया निरीक्षण करणाऱ्या पथकांच्या नजरेस आल्यानंतर ही खबरदारी घेतली जात आहे.

 

सोशल मीडियावर लक्ष ठेवणे गरजेचे

 

सोशल मीडियावर लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे. सरकारने त्यावर अनेक निर्बंध टाकले आहेत. परंतु, इतर देशांपासून काही धडा घेऊ शकतो का, याचा विचारही केला पाहिजे. शेजारील राष्ट्र चीनने देशात सोशल मीडियावर पूर्णपणे निर्बंध लावले आहेत. कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चीनमध्ये कार्यरत असेल, तर सर्व्हर चीनमध्ये ठेवावे लागतात. तसेच पाऊल भारताने उचलले पाहिजे. कोणतीही चुकीची बातमी किंवा अफवा पसरवण्यात येत असतील तर त्या त्वरित ब्लॉक केल्या पाहिजे. पोलीस खात्यामध्ये सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळा विभागच कार्यरत केला पाहिजे, ज्यामध्ये प्रशिक्षित तंत्रशिक्षित पोलिसांचा वापर करून अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या गुन्हेगारी गोष्टींना थांबवणे, त्या मागच्या कर्त्यांना पकडणे किंवा त्यांना ब्लॉक करणे या प्रकारची कामे सुरू करणे हे गरजेचे आहे. म्हणजे काश्मीर खोऱ्यातील बंदुकधारी दहशतवाद जरी कमी होत असला तरी, आता की-पॅड जिहादी किंवा फेसबुक, व्हॉट्सअॅप दहशतवादी हा नवा वर्ग सुरू होत आहे. जो चुकीच्या बातम्या पसरवून कट्टरतावाद पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून तिथे दुष्कृत्य करणाऱ्यांना पकडणे गरजेचे आहे. त्यामुळे खोऱ्यामध्ये पसरलेल्या कट्टरतावादाला रोखण्यास मदत मिळेल. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा गैरवापर करण्याचे प्रमाण काश्मीर खोऱ्यामध्ये फार वाढले आहे, प्रक्षोभक स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने नवा ठोस कायदा तयार करण्यावर भर द्यायला हवा. सोशल मीडियाचा चांगला वापर करा, नाहीतर चीनसारख्या देशांकडे बघा, तिथे इंटरनेटच्या वापरासाठी कडक नियम आहेत. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या बनावट व्हिडिओमुळे दंगल भडकल्याची उदाहरणे आहेत. हे रोखायचे असेल, तर सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे, असे दिसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@