तेलंगणातले खानदानी आरक्षण
चंद्रशेखर राव तेलंगणचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना शासन, प्रशासन, घटना याबाबत थोडे ज्ञान असलेच पाहिजे, असे गृहीत धरूया. गृहीत यासाठी की, या माजी मुख्यमंत्र्याला आरक्षण, आरक्षणाचा कोटा याबाबत निर्णय कुठे होतात? कोण घेते? आरक्षणाबाबत काही कायदे, काही घटनात्मक तरतुदी आहेत की नाही? याबाबतचे ज्ञान शून्य आहे असे वाटते. तसे नसते तर तेलंगणमधील मुस्लीम आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कोटा पंतप्रधान मोदींना पत्र लिहून वाढवतो, असे त्यांना वाटले नसते. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणमधील आदिवासी आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा कोटा वाढावा म्हणून तीस पत्रे लिहिली. ही पत्रे लिहिण्याऐवजी त्यांनी आरक्षणाच्या घटनात्मक चौकटीचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. दुसरे असे की, तेलंगणमधील मुस्लीम आणि आदिवासी मागासलेले आहेत, असे चंद्रशेखर राव यांचे म्हणणे आहे. मागासलेपणाचा काळोख आरक्षणाने उजळतो का? आरक्षण हा मागासलेपणाला खोडून टाकण्यासाठीचा कागदोपत्री पुरावा आहे. पण, वास्तव जीवनात आरक्षणाचा प्रकाश मिळूनही जगण्याच्या वाटेवर काटेच असतात. ते काटे काढण्यासाठी कोणताही समाज वैचारिक- सामाजिकदृष्ट्या सक्षम असलाच पाहिजे. त्या तशा सक्षमपणाचा विचार चंद्रशेखर राव यांनी केला आहे का? आजकाल राजकारणात झटपट प्रसिद्धीची एक टूम निघाली आहे. कोणत्याही समाजाची अस्मिता चेतवायची. त्यांच्या मनात अक्षरशः भरवून द्यायचे की, तुम्हीच काय ते मागास, आरक्षण मिळाले की काही न करता तुमच्या आयुष्याचे कोटकल्याण होणार आहे. अर्थात, गरीब-भोळ्या समाजाला हे लबाड नेत्यांचे म्हणणे खरे वाटते. मग सुरू होतो ‘आरक्षण बचाव, हटाव’चा खेळ. तेलंगणमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनाही असाच आरक्षणाच्या नावाने खेळ करायचा आहे. चंद्रशेखर राव यांना आरक्षणाची ओढ आहे, कारण राजकारणाच्या जहागिरीमध्ये चंद्रशेखर राव यांनी आपल्या खानदानाला सत्ताकेंद्री आरक्षण दिले आहे. चंद्रशेखर राव यांचा मुलगा केटी राम राव, मुलगी कलककुंटला कविता, पुतण्या हरीश राव हे तेलंगणच्या राजकारणात चंद्रशेखर रावांची जहागिरी सांभाळत आहेत. तेलंगणचे राजकारण ‘सबकुछ चंद्रशेखर खानदान’ असे आहे. चंद्रशेखर रावांना आपल्या या जहागीरदारांबाबत विसर पडलेला दिसतो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/