हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथील ५०० मीटरचा सुळका उतरायला आता सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर त्यांना ३०० मीटरचा आणखी एक सुळका उतरावा लागणार आहे. पुढे ३ तास पायी चालत गेल्यानंतर त्यांना आपल्या बेस कँपजवळ पोहोचता येणार आहे. त्यांना यासाठी किमान ६ ते ७ तासांचा कालावधी लागू शकतो. या अडकलेल्या ट्रेकर्सच्या मदतीसाठी इतर काही व्यावसायिक ट्रेकर्स हरिश्चंद्र गड येथे रवाना झाले आहेत.
कल्याणचे डॉ. हितेश आडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यांच्यासोबत ५ महिला आणि १७ पुरुष आहेत. हे सर्व ट्रेकर्स कोकणकडापासून खाली १००० फूट अंतरावर अडकले होते. अंधरात त्यांना मार्ग सापडत नव्हता. अहमदनगरच्या जिल्हाधिकारांनी ठाणे ग्रामीण पोलिस आणि जुन्नर पोलिसांना या घटनेविषयी माहिती दिली.
अंधारात मार्ग सापडत नसल्यामुळे ट्रेकर्सना रविवारची रात्र तेथेच काढावी लागली. या अडकलेल्या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन हे सातत्याने या ट्रेकर्सच्या आणि नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. तसेच ठाण्याहून काही ट्रेकर्सची मदत यासाठी घेतली जात आहे. मुरबाड येथील तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारीही या ट्रेकर्सच्या बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.