मात्र, व्हॉट्सअॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा व खोट्या बातम्यांमुळे गेल्या काही काळात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली होती. यावर कडक पाऊल उचलत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने व्हॉट्सअॅपच्या एकूणच धोरणांबाबत चर्चाही केली होती. सरकारच्या या मागणीपुढे आणि आपल्या आर्थिक विस्ताराच्या दृष्टीने बॅकफूटवर जात व्हॉट्सअॅपने आता आपल्या भारतातील मुख्यालयासाठी अध्यक्ष म्हणून एका भारतीयाची निवड केली. त्यांचे नाव आहे अभिजित बोस. फेसबुकची उपकंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपने याकरिता आधी काही अमेरिकन अध्यक्षांची निवड केली होती. मात्र, व्हॉट्सअॅपमुळे भारतात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि अफवा रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सरकारच्या या मागणीपुढे नमते घेत व्हॉट्सअॅप इनकॉर्पोरेशनने भारतीय अभिजीत बोस यांचे नाव जाहीर केले. दरम्यान, भारतात सेवा देण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. ‘डिजिटल इंडिया’च्या पार्श्वभूमीवर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे व्हॉट्सअॅपचे मुख्य संचालक मॅट इदेमा यांनी जाहीर करत भारतात सध्या तरी कोणत्याही नवीन सुविधा सुरू करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले.
मात्र, याआधी पेटीएमप्रमाणे व्हॉट्सअॅपने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सेवा सुरू केली होती, मात्र भारतात रिझर्व्ह बँकेने यामुळे गैरव्यवहार जास्त वाढतील, असे कारण देत ही सेवा बंद करायला लावली. त्यानंतर त्यांनी ‘व्हॉट्सअॅप बिझनेस’ ही सेवा सुरू केली मात्र, त्यालाही भारतात तेवढासा प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवाही व्हॉट्सअॅपकडून अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर जाहिराती देण्याची सुविधाही सुरू करण्याच्या विचारात होती, मात्र ती सेवाही अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय अॅप असले तरी, नवनवीन सुविधा देण्यात अद्याप त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे आता भारतात मुख्यालय उभारून या सर्व सुविधांकडे लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा घाट व्हॉट्सअॅपने घातला असला तरी, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या नियमावलीत राहून व्हॉट्सअॅपला आपले काम करावे लागणार. त्यामुळे सध्या व्हिडिओ कॉल, मेसेज, ग्रुप व्हिडिओ कॉल यांसारख्या सुविधा व्हॉट्सअॅप पुरवत असला तरी, खोट्या बातम्यांचे मोठे जाळेही व्हॉट्सअॅपमुळे निर्माण झाले आणि जमावाकडून हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले. पण, त्यामुळे व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते कमी झाले, असेही नाही. याकरिता मग त्यांनी एखादा मजकूर फॉरवर्ड करण्यात आला असला तर तसे त्या मजकुरावर लिहून येते, आणि असा मजकूर पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना पाठवू शकत नाही. यामुळे एकूणच व्हॉट्सअॅप सध्या बॅकटफूटवर येऊन केंद्र सरकारच्या कलाने घेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आता भारतीय मुख्यालयात भारतीय सहव्यवस्थापकाच्या निवडीनंतर व्हॉट्सअॅप भारतीयांसाठी काय नवीन धोरणे आणतो, हे नववर्षात कळेलच...
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/