एक आशा मावळताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018   
Total Views |

 
 
 
आशा असेपर्यंत बरेच काही टिकून राहात असते. आयुष्याचा धागा आशेवरच असतो. कारण आयुष्याकडून अगदी भिकार्याच्याही काही अपेक्षा असतात. मग तो मातीचे कधी सोने करत होता? त्याला तर आयुष्याकडून अपेक्षा असणे गैर नाही. दरवर्षी हंगाम आला की मातीत, कधीकाळी असले नसले ते सारेच टाकणारा, गाठचे असेल ते सारेच मातीत टाकून काही अपेक्षा करणारा अन् नंतर हंगामात मातीत टाकायला घरात किडुकमिडुकही राहिले नसताना कर्ज काढून जमीन उजवीत राहिला. कारण आशा होती. अपेक्षा पूर्ण होतील, ही आशा होती. कारण आपले श्रुती, शास्त्र, पुराणेही सांगत आली आहेत की, सारेच बुडत असताना ‘तो’ येत असतो. अवतार घेत असतो. पिढ्यान्पिढ्यांचे हे संस्कार आहेत. ‘यदा, यदाही धर्मस्य...’ धर्माला ग्लानी आली की, मग करंगळीवर तुमच्या समस्यांचे पर्वत लीलया पेलून घेण्यासाठी तो अवतार घेतो, असे सांगण्यात आले होते. ते संस्कार होते. त्यामुळे आज नाही तर उद्या नक्कीच आपलाही विचार करतील लोक म्हणून तो आयुष्यच मातीत टाकत राहिला.
 
शेतकरी सोडला तर दुसरा कुणीही असला व्यवहार करणार नाही, करत नाही. पीक येईल का, भाव मिळेल का, मिळाला तर त्यात केलेला खर्च निघेल का, नाही निघाला तर मग उरलेला वर्ष कसे काढायचे, मुलांचे शिक्षण, मुलींचे संसार... कशाकशाचीच काहीच खात्री नसताना मातीत कुणी पैसे टाकील का? अगदी अंबानीदेखील खात्री असल्याशिवाय जवळपास फुकटात इंटरनेट देत नाही. मात्र, शेतकरी कशाची काहीच खात्री नसताना मातीत आयुष्य टाकत राहिला अन् मग लोणीच्या पाटलांनी कर्ज खूप झाले अन् पिकत काहीच नाही म्हणून वर्ध्यात पहिल्यांदा आत्महत्या केली. त्यानंतर आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले शेतकर्यांच्या...
 
त्यावर खूप बोलले गेले आहे आणि लिहिलेदेखील गेले आहे. केवळ वांझोट्या चर्चा झडत गेल्या आहेत. आता तर शहरी लोक शेतकरी खरेच शेती समस्येमुळेच आत्महत्या करतात का, असा प्रश्न विचारू लागले आहेत. तो व्यसनी आहे, त्याच्या बाकी काही छंदीफंदीपणामुळे उद्भवलेल्या समस्या आहेत, त्यामुळे तो आत्महत्या करतो आणि त्याला आपण कृषी समस्या म्हणतो, असाच एकूण अवाका... काही लोक मग अपवादात्मक उदाहरणे देतात. कोण म्हणतं शेतीत समस्या आहेत? तिकडे एका शेतकर्याने बघा कशी दणक्यात शेती केली आणि पक्के घर बांधले. आणखी जमीन घेतली, अशी उदाहरणे दिली जातात. कर्जमाफी, वीजबील माफी असेच काही फायदे लाटण्यासाठी शेतकरी रडगाणे गात असतात, असे हे सांगणे.
आता व्यसने काय केवळ शेती करणारेच करतात? शेतकर्यांपेक्षा इतरांचीच लफडी जास्त निघतील. तरीही ही मंडळी आत्महत्या करत नाहीत. खेड्यात दारूचा महापूर आहे, असे म्हटले जाते. शहरांत गजबजलेल्या बारमध्ये गर्दी कुणाची असते? चार अपवाद सोडले, तर बाकीच्यांचे काय? या सार्याच प्रश्नांना बगल द्यायची असते आणि कृषक समाजाच्या विपन्नावस्थेला कारणीभूत महत्त्वाच्या घटकांत आपलाही समावेश होतो, ही कुतरणारी जाणीव दूर फेकण्यासाठी अन् जबाबदारी झटकण्यासाठी शेतकर्यांचे मरणही अप्रामाणिक आहे, असे म्हणू लागलेत लोक.
 
एक मात्र नक्की की, इतके बाप्पे आत्महत्या करत असताना त्यांच्या बायका मात्र जीवनाला धरून होत्या. त्यांनी कधीच आत्महत्या केली नाही. आता शेती त्या करत नव्हत्या, कर्ज काही त्यांच्या नावावर नव्हते, घेणेदार काही त्यांच्या अस्तनीला हात लावत नव्हते... हे खरेच आहे. मात्र, शेतीमुळे घरात समस्या होत्या, आहेत अन् त्यांचा सामना मात्र त्यांनाच करावा लागत होता. संसार बाईच सांभाळते. त्या तर शेतात अंगमेहनतही करत होत्या. नवर्याने आत्महत्या केल्यावर शेतीपासून सार्याच संसाराचा भार त्यांच्यावरच पडला. सात-बारा त्यांच्या नावाने करून देण्यात आला नाही. सरकारकडून त्यांना मोठ्या कष्टाने अन् आढेवेढे घेत कसेबसे लाखभर रुपये मिळाले, तर त्यातही वाटेकरू असतातच. तेही एकरकमी नाही मिळत. नवर्याने आत्महत्या केलेल्या शेतकरी विधवेची अवस्था खरोखरीच ‘धोबी का कुत्ता...’ अशीच असते. पोटी लेकरं असतात. यांची वयं असतात वीस-बावीस ते फारफार तर तीस-पस्तिशीच्या घरात. अवघे आयुष्य पडले असते. माहेर सावली नाकारतं अन् सासर तर उन्हाचाही कवडसा पडू देत नाही. एकटी बाई ही सार्यांनाच ‘संधी’ वाटते. तिला शेतीत वाटा नाही मिळत. नोकरी करता येत नाही. अशा एकाकी अवस्थेतही झगडत ती जगत असते. आत्महत्या नाही करत... मात्र, मागच्या आठवड्यात विपरीत घडले. सततची नापिकी, वाढती कर्जबाजारी यामुळे आलेल्या नैराश्यातून धोत्रा भणगोजी येथील आशाताई इंगळे या प्रौढ शेतकरी महिलेने स्वत:चेच सरण रचून सती गेल्यागत आत्महत्या केली. दहा वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेले. 3 एकर 20 गुंठे इतकी अत्यल्प शेती. त्यावरही 80 हजारांच्या आसपास कर्ज.
 
त्यात दोन वर्षे झालीत नापिकीच. दोन मुले आहेत. त्यांना खासगी मजुरीवर जावे लागते. पतीच्या मागे संसार सांभाळणार्या अन् मुला-मुलींचे विवाह करून देणार्या या महिलेचा धीर असा सुटला. एक ‘आशा’ संपली. शेतकर्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणे आहेत. महिला मात्र आत्महत्या करत नाहीत, असाच अनुभव होता. ही सुरुवात म्हणायची का? पतीने आत्महत्या केल्यावर शेतकर्यांच्या या विधवा कशा जगतात, याकडे कुणाचेही लक्ष नसते. काही समाजसेवी संस्था त्यांच्यासाठी काम करतात, मात्र माध्यमांसाठी या विधवांचा संघर्ष ही बातमी नसते. दीर, भासरा, सासरा हेच बर्याचदा लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात. त्या तक्रारही करू शकत नाहीत. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची कुणालाच चिंता नाही. अशाही अवस्थेत या महिला उभ्या राहतात. मुलांचा सांभाळ करतात. त्यांच्यावर वेळी लांच्छने लावणार्या अन् घराबाहेर हाकलणार्या सासू-सासर्यांचाही सांभाळ त्याच करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. काही जणींनी तर जुने कर्ज फेडले. पक्के घर बांधले. मुलींचे विवाह केले.
 
मुलांना शिक्षण दिले. वेळी शेतीही वाढविली. कष्ट उपसून हे सारे त्यांनी साध्य केले... अशी असंख्य उदाहरणे आहेत. तीदेखील समाजासमोर येत नाही. पतीच्या मरणाची जी काय थोडीफार दखल घेतली जाते तितक्याच प्रमाणात यांचे विजिगीषू जगणे बेदखल केले जाते. आम्ही अॅग्रो थिएटरच्या माध्यमातून या महिलांसोबत दिवाळी साजरी करत असतो. एकदा त्यांना विचारले, तुमचा नवरा आत्महत्या करण्याचा आधी तुम्हाला भेटला असता, तर तुम्ही काय बोलल्या असत्या? यावर त्या खूप बोलत राहिल्या. त्यांचे म्हणणे थोडक्यात हेच, ‘‘इज्जत वाचविण्यासाठी तुम्ही मरता, असे वाटते तुम्हाला, पण तुम्ही जगण्याची लढाई हारला असता. तुम्ही मरून तुमची इज्जतच चव्हाट्यावर मांडत असता...’’ हे खरेच आहे. घरची बाई म्हणजे इज्जत घराची. नवरा असा पळवाट शोधता झाला अन् आत्महत्या करून निघून गेल्यावर बाई उघड्यावर पडत असते. एक म्हणाली, ‘‘द्रौपदीच्या इज्जतीसाठी महाभारत झाले, आमच्या इभ्रतीचे युद्ध आम्हालाच लढावे लागते... गावही आमच्या सोबत नसतो. गावकीतला स्नेहाचा धागा रखरखीत व्यवहाराने तुटला आहे.’’ एका बाईच्या नवर्याने आत्महत्या केल्यावर प्रेत आणले; पण गावातले कुणी भेटायलाही आले नाही.
 
 
अगदी तहसील कार्यालयावर प्रेत ठेवून दांगडव करणारेही कुणीच तिथे नव्हते. उत्तरक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील म्हणून कुणीच आले नाही. ती मग तिच्या कुड्या सावकाराकडे गहाण ठेवून आली नि सोय झाली, हे कळल्यावर गावकरी आले... आमच्या प्रश्नावर एक बाई म्हणाली, ‘‘मी यायले म्हनलं असतं, तुमी घरात बसा, मी करतो शेती... फेडतो ना कर्ज!’’ एकीने तर, दारूतून दोघेही विषय पिऊ आणि मरून जाऊ, यासाठी नवर्याने जबरदस्ती केल्यावर वेळी त्याच्या थोबाडीत मारून त्याला भानावर आणले होते. सगळे व्यवहार तिने हाती घेतले अन् दोघांनीही कष्ट केले, आज ते सुखी आहेत. समस्या नाहीत असे नाही, पण मार्ग निघत गेले. सणवार साजरे करता येतात. वेळ-प्रसंग निभावून नेतात अन् मुलं शिकत आहेत. ‘‘बोलाले पाह्यजेन, किमान एकमेकायशी बोलाले पाह्यजेन...’’ असेही एक जण म्हणाली. आता बोलाले पाह्यजेन म्हणणारीच मूर्तिमंत ‘आशा’च स्वत:च सरण रचून मरू लागली, तर मग शेत-शिवारानं बघायचं कुणाच्या तोंडाकडे?
@@AUTHORINFO_V1@@