राज्यनाट्य स्पर्धा - समीक्षण
जळगाव,
58 व्या राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी राज बहुउद्देशीय संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय जळगाव आयोजित हनुमान सुरवसे लिखित आणि दिग्दर्शित ‘हलगी सम्राट’ या नाटकाने दमदार सुरुवात केली.
गेल्या 3 दिवसांपासून नाटकांची असलेल्या संथगतीला आज पूर्णविराम मिळून सुरुवातीपासूनच नाटकाने प्रेक्षकांवर छाप पडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. नाटकाची सुरुवातच मुळी हलगी वादनाच्या सुरात पात्र परिचयाने झाली.
प्रत्येक दाम्पत्यासाठी आपलं मूल हे सर्वस्व असते. ते त्यांची आयुष्याची पुंजी असते आणि या आपल्या मुलाने आपलं नाव रोशन करावे, आपणास जो त्रास झाला तो आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये, त्याला सर्व सुखे मिळावी असे सर्वसाधारण दाम्पत्यांचे स्वप्न असते.
अशीच हृदयस्पर्शी संहिता या नाटकाची होती. तात्या हलगी वाजवणारा तरुण. हलगी ही त्याची रोजी रोटी. हलगी वादन हे त्याचे वैभव. परिस्थितीने गांजलेला, जीवनात अनेक खस्ता खावून, मात्र त्याविषयी कसलीही तक्रार न करता तो हलगीच्या कलेवर उपजीविका करून जीवन व्यतित करीत असतो.
त्याला आपल्या मुलात आपली हलगीची कला मोठी करायची असते मात्र त्याची पत्नी आपल्या मुलाला शिक्षणाने मोठं करण्याचं स्वप्न पाहत असते.आपल्या मुलाने कलेक्टर व्हावं असं तिचं स्वप्न असते आणि तिचा तो मानस योग्य असल्याचे तात्याला पटते. पुढे शोभा तिचा मुलगा बबनया लहान असतानाच स्वर्गवासी होते, मात्र तात्या तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वारंवार बबन्याला शाळेचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून वाढवीत असतो. मात्र बबन्याचा सर्व कल हलगीकडे असतो.
त्याला स्वतःच्या मनाप्रमाने मोठं व्हायचं असते. त्याला हलगी सम्राट व्हायचं असते .बाप-बेट्याच्या या द्वंद्वात एक दिवस घरात झालेल्या त्यांच्यातील भांडणामुळे बबन्या आपल्या बापाला हलगीला स्पर्श न करण्याचे वचन देऊन शाळेत शिकून साहेब होण्याचे आश्वासन देतो.मात्र तोपर्यंत तात्याने या जगाचा निरोप घेतलेला असतो आणि आपल्या बापाच्याच अंत्ययात्रेची हलगी वाजवण्याची त्याच्यावर वेळ येते आणि नाटक संपते. अशी संवेदनशील कथा या नाटकाची.
नवतरुण नवलेखक याच्या भावस्पर्शी लेखणीतून आणि बोलीभाषेतून हे नाटक रसिकांच्या मनाचा उत्तम ठाव घेत गेले.जोडीला पूरक अशी विनोदी शैली वापरल्यामुळे नाटकाला टाळ्यांचा प्रतिसाद भरपूर लाभत होता.
राज गुंगे यांची प्रकाशयोजना आणि जयेश साळुंखे आणि लक्ष्मण राजपूत यांचे संगीत अतिशय प्रभावी. दीपक भालेराव यांचे नेपथ्यही ओक्के. सर्व कलाकारांनी रंगमंचाचा वापर अतिशय योग्य केला.
हर्षा शर्मा यांनी साकारलेली कटकटीआई सुद्धा उत्तम. हनुमान सुरवसे यांनी साकारलेला तात्या काही ठिकाणी लाऊड वाटला. त्यापेक्षा सागर भंडगर याचा बबन्या आणि राहुल सोनवणेने रंगवलेला नाम्या विशेष दारुड्याच्या अभिनयात खूप भाव खावून गेला.
एकांकिकेचे दोन अंकी नाटक करताना लेखक आणि दिग्दर्शक या दोघांना खूप मेहनत घ्यावी लागली असे जाणवले. कारण पूर्वार्धात पकड घेतलेल्या नाटकाने उत्तरार्धात खूपच प्रसंग लांबवले.
नाटकात अधिक विनोदी शैली वापरून नाटक खेचण्यापेक्षा ते भावस्पर्शी अंगाने फुलवता आले असते. काहीप्रसंगी कलाकारांचा अभिनय खूपच हाय पीच होत होता. दिग्दर्शनात हनुमान काहीसे कमी पडले.
प्रत्येक संवाद मोठ्या आवाजात बोलण्याचा हव्यास त्यांनी टाळायला हवा होता. एकूण तांत्रिक बाजू भक्कम आणि विनोदी ढंग, बोलीभाषा यावर नाटक प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेले.
एकूण ‘हलगी सम्राट’ हे नाटक प्रचंड टाळ्या घेऊन आणि विनोदी संवाद असल्याने प्रेक्षकांना हसवून गेले. पण ते फक्त एक निखळ करमणूक म्हणूनच...., भावी निकालासाठी ‘हलगी सम्राट’ या नाटकास शुभेच्छा !