देशभरात ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. मुलीचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे, तिचे शिल म्हणजे केवळ आणि केवळ तिचे कुणाशी प्रेमसंबंध किंवा त्याही पुढे प्रस्थापित होणाऱ्या नात्यांवर अवलंबून. ती नाती, ते प्रेमसंबंध मुलीला स्वतःच्या मनाने जपण्याचा हक्क नाही. कालपरवाच घडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या दोन घटना. मालेगावची नेहा चौधरी १८व्या वाढदिवसानिमित्त परजातीतील प्रियकरासोबत फिरायला गेली, अशी माहिती समजताच तिच्या आईबापांनी आणि चुलत भावाने तिचा गळा दाबून खून केला, तर सोलापूरच्या अनुराधा बिराजदार या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी असलेल्या कुटुंबाच्या मुलाशी विवाह केला म्हणून तिचीही आईवडिलांकडून हत्या करण्यात आली. भयंकर शब्दातीत. प्रेम करणे हा गुन्हा आहे का? हा फार आदिम काळापासून विचारला गेलेला प्रश्न. जातपात, धर्म, वंश, वर्ण आणि वर्ग या सर्वच स्तराच्या पातळीवर हा प्रश्न आजही समाजात भस्मासूर बनून राहिला आहे. आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, यामध्ये वंशशुद्धीपेक्षा लोक काय म्हणतील ही भावना प्रबळ झाली आहे. जणूकाही मुलीने प्रेमविवाह केला तर यांची सात कुळे नरकात बुडतील, असा भाव असतो. खरे पाहिले तर मुलगा व्यसनी, गुन्हेगार, निष्क्रीय झाला तरी लोक काही ना काही म्हणतच असतात. त्यामुळेही इज्जत जातच असते. मात्र, त्यावेळी वंशाचा दिवा म्हणून सगळे बिनदिक्कत खपवून घेतले जाते. इज्जत म्हणजे काय? त्या इज्जतीची किंमत आपणच जन्म दिलेल्या मुलीचे आयुष्य क्रूरपणे संपवणे आहे का? आईबापाला आपली मुलगी राजकुमारीच वाटते. मग या राजकुमारीला स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्याचा मौलिक अधिकार का नाही? कारण या आईबापांना भीती असते, “समाज काय म्हणेल, आपल्याला वाळीत टाकेल, आपल्या दुसऱ्या मुलीबाळीचे लग्न होणार नाही.” या भीतीपोटी आंतरजातीय विवाह करणाऱ्या किंवा प्रेमसंबंध असलेल्या मुलींची हत्या केली जाते. कधी बदलेल हे चित्र? मुलींना आपल्या तथाकथित इज्जतीच्या प्याद्यापेक्षा तीही एक भाव-भावना असलेली माणूस आहे, हे समाजाला कधी समजेल? की इज्जतीसाठी मुलगी मेली हो...चा शो कायम राहणार आहे?
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/