देशाची फाळणी होऊन आज इतकी वर्षे लोटली, पण फाळणीची चिकित्सा, मीमांसा, चर्चा अजून थांबत नाही. त्याचे कारण ही जखम भारताच्या जिव्हारी लागलेली आहे. गांधीहत्या आणि फाळणी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
लोकमान्यांच्या निर्वाणानंतर महात्मा गांधींचे युग सुरू झाले. तो २८ वर्षांचा कालखंड, त्यामध्ये गांधीजींचे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, विभाजनपूर्वकालीन आक्रोश, फाळणीचा दाह या साऱ्या गोष्टींचा ऊहापोह केला गेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकारण, त्यात त्यांना पाठिंब्याच्या अभावी आलेले अपयश, गांधीहत्येत त्यांना निष्कारण गोवण्याचा केला गेलेला प्रयत्न, अग्निदिव्यातून न्यायदेवतेने त्यांची केलेली निष्कलंक सुटका, कट कसा झाला, कट करणार्यांची इतरत्र फारशी प्रसिद्ध न झालेली माहिती, फारच अभ्यासपूर्णरित्या येथे मांडण्यात आलेली आहे. याच विषयावर कर्नल मनोहर माळगावकर यांनी ‘The man who killed Gandhi’ म्हणून एक पुस्तक लिहिले होते. त्याचा पुढचा भाग वाटावा इतकी सुरेख मांडणी अनंत ओगले यांनी केलेली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार सतीश भावसार यांनी साकारले आहे. लेखकाची शैलीदार भावस्पर्शी कारुण्याने भरलेली भाषा हा एक खास भाग म्हणावा लागेल. पुस्तक एकदा हाती घेतले की, पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवताच येणार नाही एवढा चटका लावणारे त्यांचे लिखाण आहे. इतिहासात रमणाऱ्या वाचकाला खिळवून ठेवणारे हे लेखन आहे, यात तीळमात्र शंका नाही.
पुस्तकाचे नाव: अस्त गांधीयुगाचा आणि नंतर!
लेखक: अनंत शंकर ओगले
प्रकाशक: नाविन्य प्रकाशन, पुणे
पृष्ठे: १८३
किंमत: २०० रुपये
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/