एस-४०० हे क्षेपणास्त्र आपल्याकडे आल्यास शत्रूकडून मारा झाल्यास त्याला सीमेवर किंवा शत्रूच्या जागेवर त्याला उध्वस्त करता येईल आणि ही या क्षेपणास्त्राची गुणवत्ता आहे. पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही शत्रू देशांकडून जर अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी या क्षेपणास्त्राची आपल्याला आवश्यकता असल्याचे शेकटकर म्हणाले. २१ व्या शतकात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. त्यातच शत्रूंची विमाने आपल्या क्षेत्रात येऊन हल्ला करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यांना आपल्या क्षेत्रात येऊ न देण्यासाठी आपण एस-४०० क्षेपणास्त्र रशियाकडून खरेदी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रशिया आपला हितचिंतक : रशिया हा आपला जुना मित्र आणि हितचिंतकर आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये वापरण्यात आलेली बहुतांश सामग्री रशियात तयार करण्यात आलेले होते. त्यावेळी अमेरिका आपल्याला आपल्याला युद्ध सामग्री देत नव्हता. त्यांना आपल्या युद्ध शक्तीवर शंका होती. मात्र, आता त्या मानसिकतेत फरक पडला असल्याचे शेकटकर यांनी नमूद केले.
एस-४०० मध्ये काय आहे विशेष ?· ही एक जगातिल अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे
· हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम असून ३० किलोमीटर पर्यंतच्या उंचीवरदेखील हे क्षेपणास्त्र मारा करू शकते.
· हे एक विमानभेदी क्षेपणास्त्र आहे
· हवाई संरक्षण प्रणालीचा महत्त्वाचा भाग असून २००७ मध्ये हे रशियाच्या ताफ्यात सामिल करण्यात आले.
· यामध्ये अमेरिकेच्या अत्याधुनिक फायटर जेट एफ-३५ चा मारा हाणून पाडण्याची क्षमता आहे.
· याद्वारे एका वेळी तीन क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात.
· पाकिस्तान आणि चीनच्या अण्विक मारादेखील हे क्षेपणास्त्र हाणून पाडू शकते.
आज करार होणार : दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून याचवेळी या करारांवर स्वाक्ष-या करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये अमेरिकेकडून अडथळा आणण्याची शक्यतादेखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. रशियाशी संरक्षण आणि इंटेलिजन्स क्षेत्रात करार करणा-यांवर निर्बंध घालण्यात येतील असे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे भारताच्या या करारानंतर अमेरिका काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चीनशी टक्कर : चीनकडे यापूर्वीपासून ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. मात्र, या करारानंतर भारतालाही ही क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार असून भारताच्याही संरक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. चीननेदेखील रशियाकडून यापूर्वी ही प्रणाली खरेदी केली होती. सध्या चीनची सैन्य या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करत आहे.
पुतीन ८ वेळा भारतात : पुतीन हे २००० साली रशियाचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर त्यांनी तीन कार्यकाळ पूर्ण केले आहेत. आता त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना ते पहिल्यांदा भारत दौ-यावर आले होते. तेव्हापासून ते ८ वेळा भारतात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांचा शेवटचा भारत दौरा झाला. यावेळी त्यांचा ९ वा भारत दौरा आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/