गोदावरी ते डोयांग
असे म्हणतात की, संगीत, जल आणि व्यापार यांना सीमा नसतात. हे तीनही घटक सीमोल्लंघन करून समृद्धतेचा परीसस्पर्श विविध प्रांतांना सदैव करत असतात. किंबहुना, त्यांनी तो करावा, अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे विकासाची वाट सुकर व सुखमय होण्यास मदत होते. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या व्यावसायिकांच्या संस्थेतील नाशिक विभागातील काही उद्योजकांनी नुकताच नागालँड दौरा केला. त्यामुळे गोदावरी ते डोयांग असा व्यवसायवृद्धीचा आलेख यामुळे उंचावणार आहे. नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील व्यापार, उद्योग व व्यापारी संबंध वृद्धिंगत व्हावे, नागालँडमधील तरुणांना, उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे, या उद्देशाने सदर दौऱ्याची आखणी करण्यात आली होती. नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी याकामी पुढाकार घेतला होता. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने नागालँडमधील तरुणांना या प्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच, या दौऱ्यादरम्यान विविध सामंजस्य करार केले गेले. ज्यायोगे बौद्धिक संपदेचे आदानप्रदान करणे सोयीचे ठरणार आहे. राज्यपालांबरोबर राजभवनात झालेल्या भेटीप्रसंगी नागालँडच्या विकासासाठी चर्चादेखील करण्यात आली. नागालँडमध्ये विपुल साधनसामुग्री आहे. त्याचा वापर उद्योगवाढीसाठी व्हावा, अन्नप्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत तसेच नागालँडमधील उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपालांनी चेंबरच्या प्रतिनिधींना केले आहे. त्यामुळे आता नाशिकची प्रतिभा व व्यापार कौशल्याला थेट पूर्वेकडील राज्यांत चालना मिळण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विकसनशील राज्य आहे व नागालँड हे छोटे राज्य आहे. त्यामुळे भौगोलिक परिप्रेक्ष्य जरी कमीअधिक असला तरी, नागा जनतेची कार्यक्षमता वाखाणण्याजोगी आहे, हेच या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला जाणवले. केवळ समृद्ध राज्य आणि जेथे सर्व सोयीसुविधा आहेत, अशी राज्ये, देश हेच व्यापारवृद्धीसाठी आवश्यक असतात किंवा त्यालाच प्राधान्य द्यावे, या दृष्टिकोनाला चेंबरच्या या दौऱ्यामुळे छेद मिळाला आहे. गोदावरी व डोयांगचा संगम हे एक सकारात्मक चिन्ह म्हणावयास हवे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/