मुंबई : आर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. विकासाची फळं समाजातील सर्वस्तरात सारखी वितरीत होतात किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. आय.आय.टी. पवई येथे काल झालेल्या “अलंकार- ग्लोबल लिडरशिप समिट” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी "सोच बदलो-साथ दो… सबका विकास होगा.. राज्य और राष्ट्र आगे बढेगा" असे आवाहन देखील केले.
"आजही आपल्या एका देशात तीन भारत राहतात. हिंदुस्थान, इंडिया आणि भारत. यातील दरी सांधायची असेल तर विषमतामुक्त देशाची निर्मिती व्हायला हवी. तशी व्यवस्था निर्माण करायला हवी." असे मुनगंटीवार यांनी म्हटले. यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांनी ज्ञानसंपन्न व्हायला हवे, ज्ञानसंपन्न युवक त्यांच्या बदललेल्या विचारांमधून, कृतीमधून ना केवळ स्वत: पुढे जाणार आहेत, तर त्यांचे गाव, जिल्हा, राज्य आणि देशालाही पुढे घेऊन जाणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने ज्ञानसंपन्न युवक तयार व्हावेत यासाठी, तशी पावले टाकली आहेत. मुद्रा कर्ज असेल, स्टार्टअप, स्टॅण्डअप सारख्या योजना असतील, कौशल्य विकासाची कामे असतील, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम असतील यातून हे प्रयत्न वेग घेतांना दिसत आहेत. प्रधानमंत्र्यांनी तर 'झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इंम्पोर्ट'चा संकल्प जाहीर केला आहे. यात पर्यावरणस्नेही विकासाबरोबर स्वावलंबी, रोजगारक्षम भारताची बीजं रोवली गेली आहेत. ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी युवकांचा सहभाग खूप मोलाचा ठरणार असून यासाठी करण्यात येणारे चिंतन, चर्चाही खूप महत्त्वाची आहे. असेही यावेळी ते म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/