मुंबई : “भटक्या जमाती हे आपले संस्कृती रक्षक आहेत, तर विमुक्त जमाती हे एकेकाळचे स्वातंत्र्य सैनिक आहेत,” असे मत विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले. मुंबईतील विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेची पत्रकार परिषद सोमवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या इदाते समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला असल्याची माहितीही दिली.
भटक्या आणि विमुक्त जाती, जमातींचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी सध्याचे सरकार प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे. यापूर्वीही अनेकदा यासाठी समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी केलेल्या शिफारशींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे इदाते म्हणाले. तसेच २०१४ मध्ये यासंदर्भात एक अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॅझेट काढून त्यात अन्य काही सूचना नमूद केल्या. मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या कालावधीत आघाडी सरकार पडले आणि हा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारपुढे हे प्रश्न पुन्हा मांडण्यात आले आणि त्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांसाठी इदाते समितीची नियुक्ती केली. दरम्यान, आपल्या समितीने हा अहवाल केंद्राकडे सुपूर्द केला असून केंद्रानेही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना राज्यांच्या सूचना सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले.
“सध्या केवळ महाराष्ट्रात भटक्या, विमुक्त जाती-जमातींना आरक्षण लागू आहे. त्याच धर्तीवर देशात आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या आम्ही सादर केलेल्या अहवालात दोन खंड असून पहिल्या खंडात माहितीचे विश्लेषण, तर दुसर्या खंडात प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा समावेश करण्यात आला आहे. आज राज्यातही भटक्या आणि विमुक्त जाती-जमातींमधील नागरिकांच्या समस्या भयाण आहेत. दौर्यादरम्यान आपण देशातील सगळी राज्य फिरलो. त्यामध्ये अनेक जाती-जमातींची कोणतीही नोंद नाही,” असे इदाते म्हणाले. तसेच “या दरम्यान नव्याने २६५ जातींची माहिती मिळाली असून आता भटक्या विमुक्तांमधील जातींची संख्या एक हजार ६५८ झाली आहे. या समाजातील लोकांची संख्याही १५ कोटींच्या वर आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपण सादर केलेल्या अहवालाची नीति आयोगानेही दखल घेतली असून सरकारलाही इदाते समितीचा अहवाल मान्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी एका संस्थेची गरज होती. त्यासाठी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषद हा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची स्थापना केली,” असे ते म्हणाले. यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पत्रकार परिषदेदरम्यान विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेची मुंबई महानगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सहदेव रसाळ यांची अध्यक्षपदी, मंगेश शिंगे यांची उपाध्यक्षपदी, गिरीधर साळुंके यांची कार्यवाह, तर सुजित गोसावी आणि श्रीकुमार शिंदे यांची अनुक्रमे सहकार्यवाह आणि कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/